छत्तीसगडमध्‍ये गायींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी सरकारने आयोग स्‍थापन करावा ! – संत रामबालक दास महात्‍यागी

संत रामबालक दास महात्‍यागी

भिलाई (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्‍य गोसेवा आयोगाचे संरक्षक संत रामबालक दास महात्‍यागी यांनी देहलीत जगतगुरु शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद यांच्‍या चातुर्मास कार्यक्रमात भाग घेतला आणि त्‍यांच्‍याशी विशेष चर्चा केली.

देहलीतील सफदरगंजमध्‍ये आयोजित गोसेवक सन्‍मान सोहळ्‍यात ते सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलतांना ते म्‍हणाले की, काही राज्‍यांप्रमाणे छत्तीसगडमध्‍येही गायींची स्‍थिती चांगली नाही. रस्‍त्‍यावर गायींच्‍या मृत्‍यूचे प्रमाण पुष्‍कळ वाढले आहे. अनुदानाअभावी गोशाळा समित्‍या अडचणीत आल्‍या आहेत. अशा वेळी छत्तीसगड सरकारने सर्वसमावेशक गोसेवा आयोगाची स्‍थापना करावी, अशी मागणी संत रामबालक यांनी केली.

संत रामबालक दास म्‍हणाले की, ते छत्तीसगडमध्‍ये वर्ष १९९७ पासून गोरक्षणासाठी कार्य करत आहेत. त्‍यावेळी छत्तीसगडमध्‍ये केवळ २० गोशाळा होत्‍या. १५ वर्षांत १५० गोशाळा बांधण्‍यात आल्‍या.

संपादकीय भूमिका

गायींच्‍या संरक्षणासाठी संतांना अशी मागणी करावी लागू नये. छत्तीसगडमधील भाजप सरकारने गोरक्षणासाठी स्‍वतःहून पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !