संपूर्ण जगाला तारणार्‍या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा

वर्धा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रा. विनायक (श्याम) देशपांडे

वर्धा – आज देशावर भाषावाद, जातीयवाद, धर्मांधता, आतंकवाद अशा विविध बाजूंनी आघात होत आहेत. या आघातांमुळे भारत भूमीवरील हुतात्मे, धर्मात्मे आणि संत महात्मे तळमळीने सांगत आहेत. त्यांची तळमळ ज्यांना कळत नाही, त्यांना आपण भारतीय म्हणू शकत नाही. आज राष्ट्रासह हिंदु धर्मही संकटात सापडला आहे. जेव्हा हिंदु धर्म संकटात येतो, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागतो. त्यामुळे जग टिकून रहायचे असेल, तर हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समितीचे अध्यक्ष प्रा. विनायक (श्याम) देशपांडे यांनी वर्धा येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. या महोत्सवात धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म यांविषयी फलकप्रदर्शन लावण्यात आले होते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘अध्यात्म आणि हिंदुत्व’, तसेच ‘अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या निर्मितीमध्ये सनातन संस्थेचा सहभाग’ या विषयांवरील दृश्यपट पडद्यावर दाखवण्यात आले.

३. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

हिंदु राष्ट्राविषयी बेधडक विचार मांडणारे एकमेव वृत्तपत्र ‘सनातन प्रभात’ ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे

भारतात अनेक वृत्तपत्रे आहेत; परंतु हिंदु राष्ट्राविषयी बेधडक विचार मांडणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव वृत्तपत्र आहे. देशात हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार सातत्याने होत आहेत. ते अन्य वृत्तपत्रांना दिसतात; पण त्याविषयीच्या बातम्या केवळ ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येतात; कारण ते हिंदु राष्ट्राला वाहिलेले वृत्तपत्र आहे.