पाकिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप !

पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये २९ सप्टेंबरला झालेल्या २ बाँबस्फोटांच्या प्रकरणी पाकने भारतावर आरोप केला आहे. या स्फोटांमागे भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हात असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी म्हटले आहे. या स्फोटांत ६५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर मोठ्या संख्येने लोक घायाळ झाले होते.

बलुचिस्तानमधील मस्तुंग येथील मदिना मशिदीजवळ झालेल्या स्फोटानंतर अवघ्या काही घंट्यांत खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या हंगू शहरातील एका मशिदीत आणखी एक स्फोट झाला होता.

गृहमंत्री बुगती म्हणाले की, या बाँबस्फोटांत सहभागी असलेल्यांना पाकिस्तानी सैन्य आणि इतर सर्व संस्था यांच्याकडून जशास तसे उत्तर दिले जाईल.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !