मालेगावची घटना म्हणजे देशात अराजक निर्माण करण्यासाठी विचारपूर्वक केलेला प्रयोग ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – मालेगाव येथील घटना म्हणजे देशात अराजक निर्माण करण्यासाठी विचारपूर्वक केलेला प्रयोग होता, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाव येथे धर्मांधांनी निर्माण केलेल्या दंगलसदृश्य परिस्थितीविषयी केला. हे षड्यंत्र उघड होऊ नये, यासाठी नवाब मलिक यांनी हे प्रकरण भाजपवर ढकलले. या घटनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, असे गंभीर आरोपही या वेळी फडणवीस यांनी केले. १६ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘२६ ऑक्टोबर या दिवशी बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनासाठी त्रिपुरामध्ये हिंदूंनी मोर्चा काढला; पण त्यात हिंसा झाली नाही. सामाजिक माध्यमांवर मात्र मशिदी जाळल्याची छायाचित्रे टाकण्यात आली. देहली येथील आगीची छायाचित्रे माध्यमांवर टाकून कुराण जाळण्यात येत असल्याची अफवा पसरवण्यात आली. जुन्या मिरवणुकांची छायाचित्रे टाकून हिंदू आक्रमण करत असल्याचे दाखवले गेले. या वेळी काढलेल्या मोर्च्यात हिंदूंची दुकाने निवडून तोडण्यात आली. याविषयी महाविकास आघाडीतील एकही नेता बोलला नाही. अमरावतीमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यावर कारवाईसाठी राज्य राखीव दलाच्या पोलिसांना आदेशच देण्यात आला नाही. मोर्च्यातून पोलिसांवर दगड फेकण्यात आले.  पोलिसांना घायाळ करणार्‍यांपैकी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दंगल घडवण्याचा हा प्रयोग समजून घ्या. शहरी नक्षलवाद्यांनी असाच प्रयोग कोरेगाव भीमा येथे करून पाहिला. तोच प्रयोग महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्रातील नेते म्हणतात की, आदिवासींवर अन्याय होतो. त्यामुळे ते नक्षलवाद्यांकडे वळतात. असे म्हणणे म्हणजे नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणार्‍या पोलिसांवरील अन्याय आहे. आदिवासींवर अन्याय होत नाहीत. नक्षलवाद्यांना पाकिस्तान आणि चीन यांचा पाठिंबा आहे. भाजपचा कार्यकर्ता दंगल किंवा लोकांवर आक्रमण करणार नाही; पण आमच्या अंगावर कुणी चालून आले, तर सोडणार नाही.’’