पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्यासमवेत बसून नामजप करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी) यांच्या समवेत नामजप करण्याचे भाग्य लाभले. आतापर्यंत मी केवळ ५ वेळा त्यांच्या समवेत बसून नामजप केला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. अरविंद ठक्कर

१. नामजप करतांना मनात विचार न येणे आणि ‘नामजपाचा एक घंटा कसा संपला ?’, हे न कळणे

एरव्ही नामजप करतांना माझ्या मनात विचार येतात; परंतु पू. सुमनमावशींच्या समवेत बसून नामजप करतांना माझ्या मनात मुळीच विचार येत नाहीत. पूर्वी मी नामजप करतांना प्रत्येकी १५ ते २० मिनिटांनंतर डोळे उघडून घड्याळाकडे बघत असे; परंतु पू. मावशींच्या समवेत बसून नामजप करतांना ‘एक घंटा कसा संपला ?’, हे समजत नाही.

२. पू. सुमनमावशींच्या समवेत बसून नामजप केल्यावर ताप येणे बंद होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. २ आठवड्यांपासून ताप येणे आणि ‘ताप यायचे बंद न झाल्यास रक्ताची तपासणी करवून घ्यावी लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे: पू. मावशींच्या समवेत बसून नामजप करण्यापूर्वी अनुमाने २ आठवड्यांपासून मला प्रतिदिन दुपारी ४.१५ वाजता ताप येत असे. आधुनिक वैद्यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला तापाची नोंद करून ठेवायला सांगितली. मला ताप येण्याविना अन्य काही होत नव्हते. आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘ताप यायचे बंद झाले नाही, तर रक्ताची तपासणी करवून घ्यावी लागेल.’’

२ आ. पू. सुमनमावशींच्या समवेत बसून नामजप केल्यावर टप्प्याटप्प्याने ताप येणे बंद होणे

२ आ १. पू. सुमनमावशींच्या समवेत बसून नामजप करायला आरंभ केल्यावर दुपारी ४.१५ वाजता ताप येणे बंद होणे : दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत पू. मावशींच्या समवेत बसून प्रथमच नामजप करतांना माझ्या लक्षात आले, ‘मला दुपारी ४.१५ वाजता ताप आला नाही.’ मला भीती वाटत होती की, त्यानंतर मला लगेच ताप येईल; परंतु त्या रात्री ८ वाजेपर्यंत मला ताप आला नाही. यापूर्वी ताप आल्यावर मला त्वरित औषध घ्यावे लागत होते; मात्र मी त्या रात्री ११ वाजता औषध घेतले. पुढील २ दिवस पू. मावशींच्या समवेत बसून नामजप केल्यावर असेच घडले. त्यानंतर मला दुपारी ४.१५ वाजता ताप येणे बंद झाले.

२ आ २. नंतर मी ज्या दिवशी पू. मावशींच्या समवेत बसून नामजप करत नव्हतो, त्या दिवशी दुपारी ४.१५ ते ४.३० या कालावधीत मला ताप येत होता.

२ आ ३. मी पू. मावशींच्या समवेत बसून ४ वेळा नामजप केल्यावर काही दिवस मला रात्री ९ वाजता ताप येऊ लागला. त्यानंतर मी पू. मावशींच्या समवेत बसून नामजप केला नाही, तरी मला ताप आला नाही.

२ आ ४. मी पू. मावशींच्या समवेत बसून नियमितपणे नामजप करू लागल्यावर मला ताप येणे बंद झाले. आधुनिक वैद्यांना ‘हे कसे झाले ?’, हे समजलेच नाही.

३. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा अगाध आहे. ‘ते अनुभूतीतून कुणाला काय शिकवू इच्छितात ?’, याविषयी तेच जाणतात. ‘ते साधकांवर संतांच्या माध्यमातून अमृत आणि प्रेम यांचा वर्षाव करत आहेत’, एवढेच मला ठाऊक आहे. त्याविषयी परात्पर गुरु डॉक्टर आणि संत यांच्याप्रती आम्ही जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.’

– श्री. अरविंद ठक्कर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक