पोलीसदलाची प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी सर्वसामान्य पोलीसच खरा कणा !

‘महाराष्ट्रातात अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाविषयी काही प्रश्‍नचिन्ह उभे राहिले असले, तरी हे सावट पोलीसदलालाच प्रामाणिकपणे प्रयत्न करून दूर करावे लागेल. तसेच एक-दोन घटनांमुळे पोलीसदलाला सरसकट दोषी ठरवणेही योग्य नाही. मुळात मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलाची स्वतःची स्थिर अन् स्थायी रचना, तसेच व्यवस्था आहे. या रचनेत जसे अस्वाभाविक काम करणारे काही अधिकारी आहेत, तसेच एका निष्ठेने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे सर्वसामान्य पोलीसही आहेत. हे सामान्य पोलीसच पोलीसदलाचा खरा कणा आहेत. काही घटनांमुळे मुंबई पोलिसांवरील विश्‍वासास तडा गेला असून त्यामुळे मोठी हानी झाली आहे. ही हानी लगेच भरून निघण्याजोगी नाही. जनसामान्यांच्या दृष्टीने पोलीस व्यवस्थेच्या संबंधी अविश्‍वास स्पष्टपणे दिसू लागला आहे. पोलीसदलाच्या प्रतिमेस अपरिमित हानी पोचली असून ती भरून काढण्यासाठी आज तरी समोर कोणताही तात्काळ उपाय दिसत नाही. त्यामुळेच हे सर्व मळभ हटवण्यासाठी प्रामाणिकपणे, विनम्रपणे आणि चिकाटीने स्वतःचे काम नियमितपणे करणार्‍या सर्वसामान्य पोलिसांना केंद्रस्थानी ठेवूनच पुढील मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त झाले आहे.

लेखक : जयजित सिंह, महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख (शब्दांकन : ज्ञानेश्‍वर रायभान वाघ, पोलीस निरीक्षक, आतंकवादविरोधी पथक)

 

प्रतिकात्मक छायाचित्र

सर्वसामान्य पोलिसांचे असामान्य योगदान !

पालटत्या काळानुसार सर्वसामान्य जनतेच्या मनातील पोलिसांची प्रतिमा ही एकतर ‘गुन्हेगार पोलीस’, ‘दिखाऊ पोलीस’ किंवा ‘असामान्य शक्तीशाली पोलीस’, अशी बनत गेली आहे. त्यामुळे दुर्दैवाने एकतर उतावीळ किंवा थेट अतीमानवी क्षमता असलेला असामान्य शक्तीशाली असा ‘सुपरकॉप’ असे पोलिसांच्या प्रतिमेचे सरळ सरळ दोन विरुद्ध टोकांमध्ये विभाजन झालेले दिसते; परंतु सुदैवाने या देखाव्याच्या पलीकडे मुंबई-महाराष्ट्र्राच्या पोलीस दलाची एक अतिशय स्थिर आणि स्थायी अशी रचना अन् व्यवस्था आहे. पोलीसदलातील विविध स्तरांवर शांतपणे, दृढतेने आणि अविचलपणे कार्यरत असणारे; परंतु कधीही प्रकाशझोतात न येणारे अन् थेट दृष्टीस न भरणारे अनेक सर्वसामान्य पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे या स्थिर अन् स्थायी पोलीसव्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत. हे सर्वसामान्य पोलीस कधीही तात्काळ उपाय शोधण्याच्या नावाने नियमांचा भंग करत नाहीत किंवा स्वतःच्या गौरवासाठी अथवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्याही चुकीच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांनी कधीही एखादी दैदिप्यमान कामगिरी केलेली नसते; परंतु हेच सर्वसामान्य पोलीस अढळपणे आणि सातत्याने स्वतःचे नियमित कर्तव्य पार पाडून मुंबईसारख्या अफाट अन् गुंतागुंतीच्या शहरातील आर्थिक, धार्मिक आणि जातीय विषमता, आर्थिक चढ-उतार, तसेच उच्चभ्रू गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाय यांमधून मार्ग काढत या महानगरीचे चक्र सदैव फिरते ठेवण्यात असामान्य योगदान देत असतात.

सर्वसामान्य पोलिसांनी निस्सी श्रद्धा आणि अभिमान यांमुळे काम करणे

हे स्थानिक पातळीवर काम करणारे तळागाळांतील सर्वसामान्य पोलीस त्यांचे केवळ दैनंदिन कर्तव्येच पार पाडत नाहीत, तर अविरत कष्ट घेऊन पोलीसदलाचा लौकिक आणि त्याची वर्षानुवर्षांची उज्ज्वल परंपरा अबाधित ठेवून ती आपल्या खांद्यावर पेलत पुढे नेत असतात. हे सर्वसामान्य पोलीस झोपडपट्ट्यांमधील अरुंद, कोंदट आणि अंधार्‍या गल्ल्या, अनधिकृत वेश्या व्यवसायासाठी कलंकित झालेली क्षेत्रे अन् जुगाराच्या अड्ड्यांचा अतिशय चिवटपणे आणि एका संशोधकाच्या उत्साहाने शोध घेत असतात. त्याच वेळी ते पांढरपेशी उच्चभ्रू गुन्हेगारांच्या क्लृप्त्याही समजून घेत असतात. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील कालावधीत कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न उद्भवूू नये; म्हणून ते सामान्य माणसाच्या अंतर्मनातील सांस्कृतिक, पारंपरिक आणि भावनिक बारकाव्यांचाही अचूक वेध घेत असतात. ते तळागाळातील लोकांशी नित्य नवीन वैयक्तिक संबंध जोडत असतात. खबर्‍यांंचे जाळे सिद्ध करून ते जोपासत असतात आणि पोलीस कामातील ज्ञान वृद्धिंगत करत स्वतःचे कर्तव्य व्यावसायिक रितीने चोखपणे पार पाडत असतात. कोणताही सुगावा मिळाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई करतांना अपयश येऊनही त्यातून काहीतरी शाश्‍वत हाती लागेपर्यंत ते काळ-वेळ आणि वैयक्तिक असुविधा यांचा विचार न करता त्याचा अविरत पाठपुरावा करत असतात. असे करतांना ते त्यांच्या ८ घंट्यांच्या कर्तव्यकाळाचा कधीही बागुलबुवा करत नाहीत. त्यांच्या या अविरत कष्ट करण्यामध्ये पैसा किंवा प्रसिद्धी ही प्रेरणा कधीही नसते. हे सर्व ते केवळ त्यांची कामाप्रती असलेली निस्सीम श्रद्धा आणि कामामध्ये त्यांना वाटणारा अभिमान यासाठी करत असतात.

पोलीसदलाच्या अविरत कामकाजामध्ये अतिवरिष्ठ अधिकार्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान

आय.पी.एस्., तसेच राज्य स्तराच्या वर्गातील अनेक अधिकारी हेसुद्धा कठीण परिस्थितीत अचूक निर्णय घेऊन चांगले नेतृत्वगुण दाखवून अनेक अभियानांमध्ये स्वतः उतरतात. त्यातील अतिवरिष्ठ अधिकारी हे पोलीसदलास दळणवळणाच्या आणि इतर आवश्यक सुविधा, गणवेश अन् शस्त्रास्त्रे पुरवणे, पोलिसांची रहाण्याची अन् आरोग्याची व्यवस्था करणे इत्यादीसाठी कराव्या लागणार्‍या नियोजनांमध्ये सातत्याने घंटोन्घंटे आखणी करत असतात. त्याचे मूल्यांकन आणि सुधारणा करत असतात. असे अधिकारी अभावानेच वार्ताहर परिषदा घेतांना किंवा रक्षणकर्ते, तारणहार म्हणून शेखी मिरवतांना दिसतात; परंतु तरीही ते पोलीसदलासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असतात. पोलीसदलाच्या विनाअडथळा अविरत कामकाजामध्ये नित्य महत्त्वपूर्ण योगदान देत असतात.

अव्याहत आणि तत्पर कर्तव्यपूर्तीमध्ये सर्वसामान्य पोलिसांचाच खरा सहभाग !

बर्‍याचदा चाकोरीबाहेरील अस्वाभाविक काम करणारे अपवादात्मक पोलीस अधिकारी आणि अंमलदार हेच प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी असतात; परंतु त्यासमवेतच प्रामाणिक, विनम्र आणि चिकाटीने तळागाळातील नियमित काम करणारे सर्वसामान्य पोलीस हेच या पोलीसदलाचा खरा कणा आहेत, हे कधीही विसरून चालणार नाही. तेही मनुष्यप्राणी आहेत आणि त्यांच्याही हातून चुका होणारच; परंतु पोलीसदलाच्या संस्थात्मक रचनेशी त्यांची असलेली निष्ठा आणि वैयक्तिक इच्छा, आकांक्षा अन् आत्मगौरवापेक्षा पोलीसदलाच्या कामाचेच त्यांच्यासाठी असलेले अनन्यसाधारण महत्त्व त्यांना दिलेल्या कर्तव्यापासून शक्यतो भरकटू देत नाही. या सर्वांची संयत, वरकरणी अदृश्य आणि एकदम डोळ्यांत भरणार नाही, अशी पोलीसदलातील उपस्थिती अन् अविरत कष्टच पोलीसदलास त्याची गत विश्‍वासार्हता मिळवून देतील. पोलीसदलाच्या अव्याहत, नित्य आणि तत्पर कर्तव्यपूर्तीमध्ये याच सर्वसामान्य पोलिसांचा खरा सहभाग आहे. स्वतःच्या वैयक्तिक आत्मगौरवाचा आणि कौतुकाचा कधीही विचार न करता स्वतःचे काम प्रामाणिकपणे करणारा हा सर्वसामान्य पोलीसच सध्याच्या संकटावर मात करून पोलीसदलाची सर्व प्रतिष्ठा त्यास परत मिळवून देऊ शकतो हे निश्‍चित !’

(संदर्भ : दैनिक ‘सामना’)