पुणे येथे ३ वर्षांत ४ सहस्र ५०० महिलांच्या हरवण्याची नोंद !

पुण्यात महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ

संसारातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी संयम आणि तडजोड करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. असे का वागायचे असते, याचे शास्त्र समजले की, कृती करणे सोपे जाते. यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

पुणे, ५ एप्रिल – घरगुती वादांमुळे कंटाळून घर सोडणे आणि प्रियकरासमवेत पळून जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील महिला हरवण्याचे प्रमाण (मिसिंग केस) वाढले आहे. गेल्या ३ वर्षांत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ४ सहस्र ५०० महिलांच्या हरवण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडील आकडेवारीनुसार घरगुती वाद आणि प्रियकरासमवेत निघून जाण्यात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. तसेच राग शांत झाल्यावर घरी परतणार्‍या महिलांचे प्रमाणही ७० टक्के असल्याचे दिसून आले आहे.

‘मिसिंग’ प्रकरणात महिला न सापडल्याच्या २०० घटना घडल्या आहेत. पोलीस ठाण्यात येणार्‍या ‘मिसिंग’कडे गांभीर्याने पहाण्याचे प्रमाण पुष्कळच अल्प झाले आहे. त्यात ‘पत्नी मिसिंग’ची तक्रार घेऊन येणार्‍या व्यक्तीवर प्रश्‍नांचा भडिमार करून त्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. (पोलिसांचे वर्तन असे असेल, तर कुणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येईल का ? साहाय्याच्या भूमिकेत राहून स्वतःचा आधार वाटेल, असे पोलिसांचे वर्तन होण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. – संपादक)