पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतींनी केलेल्या संशोधनात अध्यात्म अन् वैद्यकशास्त्र यांचा थेट संबंध ! – शॉन क्लार्क

‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांमधील अध्यात्मशास्त्राचे स्थान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर !

मुंबई – मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम करणार्‍या आध्यात्मिक पैलूंना आधुनिक वैद्यकशास्त्र नाकारते; मात्र आयुर्वेद रोगाचे निदान आणि उपचार या दोन्ही स्तरांवर आध्यात्मिक अन् सूक्ष्म पैलूंचा विचार करते. अध्यात्म आणि वैद्यकशास्त्र यांत समान दुवा काय आहे ? याचा अभ्यास झाल्यास रोगांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध अधिक प्रभावी होऊ शकेल का ? यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने पारंपरिक (वैज्ञानिक) आणि अपारंपरिक (सूक्ष्म-ज्ञान) पद्धतींनी केलेल्या संशोधनात अध्यात्म अन् वैद्यकशास्त्र यांचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले, असे प्रतिपादन श्री. शॉन क्लार्क यांनी १५ मार्च २०२१ या दिवशी ‘व्हर्च्युअल अ‍ॅन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्पिरिच्युअ‍ॅलिटी अँड सायकॉलॉजी’ (आय.सी.एस्.पी. २०२१) या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर करतांना केले. या परिषदेचे आयोजन सर्बिया येथील ‘टुमारो पिपल ऑर्गनायझेशन’ यांनी केले होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांमधील अध्यात्मशास्त्राचे स्थान’ या विषयावर शोधनिबंध सादर करण्यात आला. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रणेते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तर सहलेखक श्री. शॉन क्लार्क हे आहेत.

श्री. शॉन क्लार्क यांनी मांडलेली सूत्रे

१. रोगाचे निदान आणि उपचार होण्यासाठी त्याच्या मुळाशी जाणे अनिवार्य असते. कोणत्याही रोगाची ३ संभाव्य कारणे असू शकतात, असे संशोधनात निष्पन्न झाले आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, ही ती तीन कारणे होत. कोणताही रोग यांपैकी एक किंवा अनेक कारणांमुळे होत असतो.

२. वैद्यकीय आजारासह जीवनातील बहुतेक समस्यांमागील मूलभूत कारण ‘प्रारब्ध’ हे असते. यासह अनिष्ट शक्ती, पूर्वजांचे सूक्ष्मदेह इ. आध्यात्मिक कारणांमुळेही शारीरिक (उदा. त्वचारोग) किंवा मानसिक (उदा. व्यसनाधीनता) आजार होऊ शकतात.

३. त्यामुळे रोगांचे निदान करतांना खरे तर डॉक्टरांनी तिन्ही मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यानुसार उपचार करायला हवेत. उदा. एखाद्या रोगाचे मूळ कारण प्रारब्ध किंवा अनिष्ट शक्तींचा त्रास हे असेल, तर शारीरिक आणि मानसिक उपचारांना आध्यात्मिक उपचारांची जोड देणे आवश्यक असते. असे केल्याने रोगाचे पूर्ण निवारण होते. याउलट केवळ शारीरिक आणि मानसिक उपचार केल्याने रोगाची केवळ लक्षणे दूर होतात, असे संशोधनाअंती निरीक्षणास आले.

४. आध्यात्मिक स्तरावरील उपचारांच्या अंतर्गत साधना अर्थात् नित्य उपासना हाच सर्वोत्तम उपाय आहे. साधना केल्याने प्रारब्धावर मात करता येते किंवा ते निदान सुसह्य तरी होते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदेत सादर केलेला ६७ वा शोधनिबंध होता. यापूर्वी विश्‍वविद्यालयाने १५ राष्ट्रीय आणि ५१ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्‍वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.