झारखंडमध्ये गेल्या ११ मासांमध्ये १ सहस्र ६५७ बलात्कार

४०० हून अधिक अल्पवयीन मुली

अशा बलात्कार्‍यांना तात्काळ फासावर चढवायला हवे, तरच या प्रकारच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच जनतेला धर्मशिक्षण देऊन सुशिक्षित करणे आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे देणे, हीच काळाची आवश्यकता आहे !

रांची – झारखंडमध्ये गेल्या ११ मासांमध्ये एकूण १ सहस्र ६५७ महिलांवर बलात्कार झाले. यात ४०० हून अधिक अल्पवयीन मुली आणि ६०० हून अधिक वनवासी महिलांचा समावेश आहे. बहुतांश घटना या दळणवळण बंदीच्या काळात घडल्या आहेत. राज्यातील बलात्कार थांबवण्यात झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे हेमंत सोरेन सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्र्यांना राजभवनात बोलावून अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. दुमका येथे पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री सोरेन म्हणाले की, कोरोना काळामुळे लोकांमध्ये मानसिक विकार बळावला असून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

१. राज्यपाल मुर्मू यांनी बलात्काराच्या प्रकरणांमध्ये दोषींना त्वरित शिक्षा मिळण्यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, अशी सूचना झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन यांना केली आहे.

२. भाजपचे नेते आमदार सी.पी. सिंह म्हणाले, राज्यात सोरेन सरकार आल्यापासून समाजकंटकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी कोणतीही भीती राहिलेली नाही. त्याचा परिणाम महिला आणि सामान्य जनता यांना भोगावा लागत आहे.

३. काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक एम्.व्ही. राव यांनी म्हटले होते, गुन्ह्यांचा विरोध करणार्‍यांचे हातपाय तोडू. तसेच ट्विटरवर जस्टिस फॉर रांची निर्भया हा हॅशटॅग वापरणार्‍यांना नोटीस पाठवू.

४. काँग्रेसचे आमदार अंबा प्रसाद म्हणाले, कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी पोलिसांची मानसिकता पालटत नाही, तोपर्यंत परिस्थिती पालटणार नाही.

गेल्या वर्षी झारखंडमध्ये झालेल्या बलात्काराच्या काही घटना

१. दुमका येथे एका विवाहितेवर १७ लोकांनी बलात्कार केला.

२. गोड्डा येथील एका आश्रमात एका साध्वीवर सामूहिक बलात्कार झाला.

३. साहिबगंजच्या बरहेट आणि दुमका येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.

४. दुमकाच्या रामग येथे ३ मासांपूर्वी शिकवणीसाठी निघालेल्या १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली.

५. गुमला येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

६. काही दिवसांपूर्वी रांचीच्या मांडर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली.

७. पतरातू येथे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीचे शव आढळून आले. तसेच राज्यात अन्य ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण राज्यच हादरून गेले आहे.