वेदांच्या आधारित मनुस्मृति आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र हाच प्रशासन अन् राजनीती यांचा आधार

भारताच्या घटनाकारांनी प्राचीन राजकीय व्यवस्थेचा सखोल अभ्यास करायला हवा होता; कारण पाश्‍चिमात्यांना ज्ञानाचा अनुभव अधिकाधिक ५०० वर्षांचा होता, तर भारताला सहस्रो वर्षांच्या श्रेष्ठतेचा इतिहास आहे. यासंबंधी एक उदाहरण विचार करण्यासारखे आहे. महर्षि दयानंदन बडोदा येथे प्रवास करत होते. बडोद्याचे विद्वान दिवाण सर टी. माधवन् हे महर्षि दयानंदन यांच्या प्रवचनाने प्रभावित झाले आणि त्यांनी महर्षींना त्यांच्या अधिकाराच्या कक्षात असलेल्या राजपदाधिकार्‍यांना प्रवचन करण्याची विनंती केली. ही विनंती महर्षींनी मान्य केली. प्रवचने ऐकून सर माधवन् पुष्कळ भारावून गेले. महर्षि दयानंदन यांचा राजनीती आणि प्रशासन यांच्याशी थेट संबंध नसतांनाही प्रशासकीय अन् राजकीय विषयांवर ते इतके खोलवर कसे काय बोलू शकतात ?, याचेही त्यांना आश्‍चर्य वाटले. शेवटी त्यांनी महर्षि दयानंदन यांनाच विचारले. त्यावर महर्षींनी उत्तर दिले, ‘‘हे सर्व मनुस्मृति आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यांत दिलेले आहे. या दोघांचा पाया वेद आहे.’’ त्यानंतर सर माधवन् यांनी महर्षींच्या प्रवचनांचा आधारे इंग्रजीत एक पुस्तक लिहिले.

(संदर्भ : मासिक ‘गीता स्वाध्याय’, जानेवारी २०१३)