‘ख्रिस्ती गावां’चा धोका !

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींना लाथ मारणार्‍या प्रवीण चक्रवर्ती या पाद्य्राला आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केली. या पाद्य्राने राज्यात ६९९ ‘ख्रिस्त व्हिलेज’ नावाची गावेही बनवली आहेत. या पाद्य्राचे नाव ‘प्रवीण चक्रवर्ती’ आहे. याचा अर्थ कधी तरी प्रवीण चक्रवर्ती किंवा त्याचे पूर्वज यांनी धर्मांतर केले असावे. हिंदु धर्माविषयी द्वेष असणार्‍या या पाद्य्राला हिंदु नाव कसे काय चालते, हाही एक संशोधनाचा विषय. असो. येथे कळीचे सूत्र ६९९ गावे ख्रिस्ती झाली, याचे ! यावरून प्रवीण चक्रवर्ती आणि इतर धर्मांध ख्रिस्ती यांनी आंध्रप्रदेशात किती मोठ्या प्रमाणात धर्मांतराच्या कारवाया राबवल्या असतील, याची कल्पना येते. प्रवीण चक्रवर्ती हा ख्रिस्ती गावांविषयी माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तो हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींना लाथ मारल्याचे सांगून त्यातून त्याला आनंद मिळत असल्याचे सांगत आहे. ‘बाटगे हे पोपपेक्षाही कडवे असतात’, अशी म्हण आहे. या पाद्य्राच्या या हिंदुद्वेषी कृत्यांवरून हे पुन्हा एकदा स्पष्ट होते. या पाद्य्राने जेवढ्या हिंदूंचे धर्मांतर केले असेल, त्यांच्यात किती मोठ्या प्रमाणात हिंदुद्वेष निर्माण केला असेल ? त्यामुळे एका राज्यात ६९९ गावे ख्रिस्ती होणे, ही सामान्य गोष्ट नाही.

प्रवीण चक्रवर्ती

धर्मांतर हे राष्ट्रांतर. ईशान्येकडील राज्यांमध्ये ख्रिस्त्यांची संख्या वाढल्यावर याचा प्रत्यय बर्‍याच वेळा आला. या ६९९ गावांमधील बहुतांश धर्मांतरित ख्रिस्त्यांची मानसिकता ही हिंदुद्वेषी असेल, हे वेगळे सांगायला नको. या गावांमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदु कुटुंबियांशी हे बाटगे ख्रिस्ती कशा प्रकारे वागत असतील ?, त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव येत नसेल कशावरून ? असे विविध प्रश्‍न प्रवीण चक्रवर्ती याच्या व्हिडिओमुळे हिंदूंच्या मनात निर्माण होतात. एवढे होत असतांना आंध्रप्रदेशमधील वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार काय करत होते ? जगनमोहन रेड्डी हे कट्टरतावादी ख्रिस्ती आहेत. राज्यात मागील ८-९ मासांमध्ये १५० हून अधिक हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर रेड्डी यांनी या प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. या समितीने या तोडफोडीच्या प्रकरणात भाजपच्याच कार्यकर्त्यांना अटक केली. याचा अर्थ, समाजातील शांतता भंग करण्यासाठी हिंदूंनीच हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडण्याचे षड्यंत्र रचले, असे होते. हिंदूंना अपकीर्त करण्याची आंध्रप्रदेश सरकारची ही सुनियोजित चाल तर नसेल ? या सर्व घटना पहाता ‘हिंदूंच्या धर्मांतर करण्यासारख्या घटनांना त्यांचा पाठिंबा आहे’, असे म्हणण्यास वाव आहे. रेड्डी जितका काळ आंध्रप्रदेशमध्ये सत्तेवर रहातील, तितका काळ तेथील हिंदूंना कुणीही वाली असणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे दायित्व वाढते. या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून प्रवीण चक्रवर्तीसारख्या बाटग्या पाद्य्रांवर कारवाई करणे आवश्यक आहे. एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत असल्यास ते सरकारी यंत्रणांचे अपयश आहे. भारतीय प्रशासन ‘निधर्मी’ असल्यामुळे अशा घटनांविषयी यंत्रणेला काही वाटत नाही. त्यामुळे सरकारने धर्मांधांवर वचक बसवण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.