महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी

धर्मप्रसार करणार्‍या संस्थेच्या साधकांची चौकशी करणार्‍या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !

एका जिल्ह्यातील २ तालुक्यांत सनातनच्या साधकांची स्थानिक पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या वेळी पोलिसांनी भ्रमणभाषवर संपर्क साधून साधकांची चौकशी केली अन् विविध प्रश्‍न विचारून माहिती घेतली.

एका तालुक्यातील एका साधकाला संबंधित पोलीस ठाण्यातून एका पोलीस कर्मचार्‍याने भ्रमणभाषवर संपर्क करून ‘तुमचे कार्य कसे चालते ?’, ‘सध्या तुमचे अध्यक्ष कोण ?’, ‘त्यांचा संपर्क क्रमांक मिळेल का ?’ आदी प्रश्‍न विचारले. यावर साधकाने ‘सध्या आम्ही एकत्र येत नाही’, असे सांगितले. तसेच त्याने ‘मी अन्य कामांत व्यस्त असल्याने नंतर संपर्क क्रमांक कळवतो’, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी पुन्हा त्या पोलीस कर्मचार्‍याने संपर्क करून साधकाकडे विचारणा केल्यावर साधकाने समिती समन्वयकाचा संपर्क क्रमांक दिला.

जिल्ह्यातील अन्य एका तालुक्यातील साधकाला संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याने संपर्क केला. या पोलिसाने साधकाला ‘सनातनची स्थापना कधी झाली ?’, ‘संस्थापक कोण ?’ ‘इथले प्रमुख कोण ?’ असे प्रश्‍न विचारले. त्यानंतर त्याने ‘तुमचे नाव, तसेच अन्य दोन साधकांची नावे आमच्याकडे आहेत’, असे सांगितले. ‘जयंत आठवले कोण आहेत ?’ ‘संस्थापक आठवले आता काय करतात ?’, असेही प्रश्‍न विचारले. (उच्च कोटीच्या संतांविषयी आदरभाव नसलेले पोलीस ! भारतातील पोलीस अन्य पंथियांचे पाद्री आणि मौलवी यांचा मात्र आदर करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) साधकाने ‘ते आता आजारी असून कुठेही जात नाहीत’, असे सांगितले. तेव्हा ‘ठीक आहे. त्यांचे नाव (सूचीतून) कमी करतो’, असे तो पोलीस कर्मचारी म्हणाला. ‘संस्थेची माहिती कुठे मिळेल ?’ ‘तुम्ही सध्या काय करता ?’ असेही त्या कर्मचार्‍याने विचारले. संस्थेविषयी माहिती घ्यावी लागेल, तसेच मी सध्या नामजप करतो, असे साधकाने सांगितले. संस्थेचा नोंदणी क्रमांकही (रजिस्ट्रेशन नंबर) पोलीस कर्मचार्‍याने विचारला.