पिण्याच्या पाण्यासाठी गोव्यात आता स्वतंत्र खाते !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

पणजी, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन करून पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र खाते स्थापन करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. पर्वरी येथील जलकुंभाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी पुढील महत्त्वाची सूत्रे सांगितली.

१. जलाशयापर्यंत पाणी आणून देणे, हे यापुढे जलस्रोत खात्याचे दायित्व असणार आहे. या कामात कसूर करणार्‍या अभियंत्यांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना प्रतिदिन किमान ४ घंटे पाणी देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

२. स्वतंत्र पाणी खाते लवकरच अस्तित्वात येणार आहे आणि पाण्यासाठी लोकांची परवड होणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत सध्या रस्ते, इमारत आणि पाणी विभाग येत असतात. बांधकाम खाते रस्ते आणि इतर कामे यांवरच अधिक लक्ष देत असल्याने पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष होते आणि यामुळेच सरकारने स्वतंत्र खाते स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार या अंतर्गत पुढील २५ वर्षांचे नियोजन करणार आहे.

३. कोमुनिदादींनी सरकारला विकासकामांसाठी भूमी दिली पाहिजे. (कोमुनिदाद ही गावकर्‍यांची पोर्तुगीज काळातील संस्था) ‘किटला’, ‘साल्वादोर-द-मुंद’ कोमुनिदाद यांनी भूमी दिल्याने हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकलो. राज्यातील अन्य कोमुनिदादींनी याचा आदर्श घ्यावा.

४. तिलारी प्रकल्पावर सरकारने किती काळ अवलंबून रहायचे ? तिलारीचे कालवे अत्यंत जुने झाल्याने ते फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. कुडासे, दोडामार्ग येथे कालवा फुटल्यानंतर गोवा सरकारला तो दुरुस्त करावा लागला. पाणी न मिळाल्यास लोक सरकारला दोष देतात; मात्र वस्तूस्थिती समजून घेत नाहीत. गोव्यातच नवीन जलस्रोत शोधून ते उपयोगात आणण्यासाठी सरकार आता प्राधान्य देणार आहे.

५. सरकार प्रतिमास १६ सहस्र लिटरपर्यंत पाणी विनामूल्य देते आणि या योजनेचा राज्यातील ४० टक्के कुटुंबे लाभ घेत आहेत. सरकार प्रत्येक कुटुंबाला ३ रुपये प्रतिक्युबिक लिटर दराने पाणी देते; मात्र सरकारला पाणीपुरवठा करण्यासाठी २० रुपये प्रतिक्युबिक लिटर खर्च येतो. यामुळे प्रतिक्युबिक लिटर १७ रुपये तोटा सरकार सहन करते. सरकार ‘गृह आधार’, ‘लाडली लक्ष्मी’ किंवा अन्य कल्याणकारी योजना यांचे पैसे देतांना
लोकांना दिसतात; मात्र सरकार विनामूल्य पाणी देते, याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. लोकांनी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. वाहने धुण्ो किंवा इतर कामे यांसाठी पाणी वाया घालवू नये.

पर्वरी येथे उड्डाणपूल मुदतीच्या आधीच पूर्ण करू !

पर्वरी येथील उड्डाणपूल निर्धारित मुदतीच्या पूर्वीच पूर्ण होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. १२ फेब्रुवारी या दिवशी उड्डाणपुलाच्या कामाची पहाणी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्याच्या विकासासाठी पुढील २५ वर्षांच्या विकासाचे नियोजन करून विविध प्रकल्प सरकारने हाती घेतले आहेत.’’