Shahbaz Sharif On Terrorism : पाकिस्तानात पूर्वीच्या सरकारांनी आतंकवाद्यांना आश्रय दिला !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जाहीर सभेत केले मान्य !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान जिहादी आतंकवादाचा कारखाना म्हणून ओळखला जातो; मात्र त्याने कधीही हे मान्य केले नाही. आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याची स्वीकृती दिली आहे. एका जाहीर सभेत बोलतांना त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या पूर्वीच्या सरकारांनी देशात आतंकवाद आणला आहे.

पंतप्रधान शरीफ म्हणाले की,

वर्ष २०१८ पर्यंत पाकिस्तानमध्ये आतंकवाद पूर्णपणे नष्ट झाला होता. आतंकवादामुळे ८० सहस्र पाकिस्तानी हुतात्मा झाले. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कधीही भरून न येणारी हानी आतंकवादामुळे झाली होती. पाकिस्तानी सैनिकांनी बलीदान दिल्यानंतर आतंकवाद पूर्णपणे नष्ट झाला. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी एका सरकारने (इम्रान खान) त्यांना पुन्हा पाकिस्तानात येण्याची अनुमती दिली आणि ते ‘शांततेचे दूत’ असल्याचे सांगितले. पाकिस्तानशी यापेक्षा मोठे वैर असू शकत नाही. (मुळात इम्रान खान यांनीच प्रथम मान्य केले की, पाकमध्ये जिहादी आतंकवाद सरकारांकडून पोसण्यात आला. अफगाणिस्तानच्या प्रकरणी साहाय्य करण्यासाठी अमेरिकेकडून पैसे घेऊन आतंकवाद्यांना पोसण्यात आले. दुसरीकडे याच पैशांतून भारताच्या विरोधात आतंकवादी कारवाया चालू करण्यात आल्या. याविषयी शरीफ का बोलत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पूर्वीच्या नाही, तर सर्वच आणि आताचे सरकारही आतंकवाद्यांना आश्रय देत नाही, तर त्यांची निर्मिती करत आहे. केवळ आश्रय दिल्याचे सांगून अर्धसत्य सांगितले जात आहे !
  • शरीफ यांना वाटते की, ती चूक होती, तर आता ते हा आतंकवाद नष्ट का करत नाहीत ? त्यासाठी भारताचे साहाय्य का घेत नाहीत ? मुळात शरीफ असो कि अन्य कोणताही पाकिस्तानी सत्ताधीश आतंकवादावर कोणतीही कारवाई न करता केवळ नक्राश्रूच वहाणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे !