संपादकीय : तहव्वूरला आणले इतरांचे काय ?

मुंबईतील आक्रमणातील मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा

पाकिस्तानचा आतंकवादी आणि मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी आतंकवादी आक्रमण करण्याचे नियोजन ज्याने केले, तो तहव्वूर राणा याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतात आणण्यात आले. तहव्वूर राणा याला भारतात आणल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये आणि एकूणच राजकीय नेत्यांमधून मोठे काम केले, असा आविर्भाव व्यक्त होत आहे. तहव्वूर राणा याला भारतात आणणे, हे निश्चितच मोठे काम आहे, यात वाद नाही. आता तर काँग्रेसने ‘आम्हीच तहव्वूर राणा याला भारतात आणण्यासाठी अधिक प्रयत्न केले आहेत. काही वर्षांपूर्वी आम्ही प्रयत्न चालू केले म्हणून आता त्याचे प्रत्यार्पण शक्य झाले आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप यांचे यामध्ये काहीही योगदान नाही’, असा सूर आळवला आहे, म्हणजे वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणानंतर १८ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यातील कटाच्या ‘मास्टरमाईंड’ला आता एवढ्या वर्षांनंतर केवळ अटक झाली आहे, त्याला अद्याप शिक्षाही सुनावणे राहिले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तहव्वूर याला या आक्रमणानंतर अमेरिकेने पकडले आहे. त्याने अमेरिकेत १४ वर्षांची तेथील न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगली आहे, म्हणजे तसे भारतीय पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांचे यात कर्तृत्व काय ? असा प्रश्न जनतेला पडतो. खरेतर ही तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातील मोठी चूक आणि सुरक्षायंत्रणांचे अपयशच आहे.

पाकच्या आतंकवाद्यांनी भारतातील मुंबईत येऊन शेकडो लोकांना ठार केले. आक्रमण करणार्‍यांपैकी १ आतंकवादी वगळता अन्य तेव्हा ठार झाले. कसाबला फाशी देण्यासाठी कितीतरी वर्षे निघून गेली. पाकला त्यानेच आतंकवादी पाठवून हे आक्रमण केले, याचे पुरावे देण्यासाठी काँग्रेसने अनेक वर्षे वाया घालवली. पाकवर प्रतिआक्रमण कधी करणार ? हा प्रश्न भारतातील लोकच नव्हे, तर पाश्चात्त्य देशांचे प्रमुखही विचारू लागले, तरी तत्कालीन शासनकर्ते ढिम्मच ! आतंकवादी आक्रमणाचा सूड कसा घ्यायचा असतो ? हे हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने केलेल्या भीषण प्रतिआक्रमणातून लक्षात येते. हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलच्या शेकडो नागरिकांना ठार केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीचा पूर्ण नकाशाच पालटला आहे. गाझामध्ये सहस्रो आतंकवाद्यांना ठार करण्यासह त्यांची ठिकाणे, रहाती घरे, कार्यालये, नातेवाइकांची घरेसुद्धा नष्ट केली आहेत. गाझा रहाण्यालायक तरी असेल का ? हा प्रश्न आहे. आतंकवादी आक्रमणाच्या कटात सहभागी असणारे हमासचे सर्व प्रमुख, कमांडर, त्यांना पैसे पुरवणारे अशा सर्वांनाच इस्रायलने भूमीतील काही मीटर खोलवर असलेल्या त्यांच्या बंकरमध्ये घुसून ठार केले आहे. काही प्रमुखांना इराणसारख्या शत्रूदेशात शिरून ठार केले आहे. हमासचे भूमीखाली काही फुटांवर असलेले रस्त्यांचे शेकडो किमी जाळे नष्ट केले आहे, म्हणजे पुन्हा हमासला आतंकवाद्यांची संघटना म्हणून उभी रहाण्यासही भीती वाटेल किंवा त्यांना पुन्हा उभे रहाताही येणार नाही, अशी स्थिती केली आहे.

पाकमध्ये शेकडो आतंकवाद्यांचे वास्तव्य !

या तुलनेत पाकचे असे काही झाले आहे का ? पाकच्या नागरी भागात शिरून भारताकडून तेथील आतंकवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले आहेत का ? आपण सर्वसामान्य माणसांच्या जीविताचा विचार करतो आणि तेथील तळ नष्ट करणे टाळतो. याउलट इस्रायलला आतंकवादी एखाद्या रुग्णालयात लपल्याची माहिती मिळाली, तरी ते रुग्णालय पूर्वसूचना देऊन नष्ट करतो. आतंकवादी नष्ट होणे, हेच त्याच्या दृष्टीने प्राधान्य ! देशातील पोलीस, अन्वेषण यंत्रणा यांचा आदर राखलाच पाहिजे, यात दुमत नाही; मात्र शत्रूराष्ट्राकडून जेव्हा भ्याड आतंकवादी आक्रमण होते, तेव्हा त्याच त्वेषाने जर त्याला प्रत्युत्तर दिले नाही, तर पुढची अनेक आतंकवादी आक्रमणे होत रहातात. २६ नोव्हेंबरच्या आतंकवादी आक्रमणानंतर पुलवामाच्या मोठ्या आक्रमणांच्या व्यतिरिक्त अनेक आतंकवादी आक्रमणे झाली आहेत, ज्यामध्ये सामान्य माणसांसह सुरक्षादलाचे अधिकारी, सैनिक यांचा मृत्यू झाला आहे, म्हणजे २६ नोव्हेंबरच्या आतंकवादी आक्रमणाच्या तुलनेत भारताने पाकला काहीच प्रत्युत्तर दिलेले नाही, पाकची जराही हानी झालेली नाही, हे लक्षात येते. अशा वेळी एक कोण तहव्वूरला तेही दुसर्‍या देशाने पकडला आहे, त्याला भारतात आणल्याविषयी पाठ थोपटून घेण्यात अर्थ आहे का ? अद्यापही पाकमध्ये मुंबई बाँबस्फोटाच्या कटाचा मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम कासकर आहे. अन्य महत्त्वाच्या आतंकवादी प्रमुखांमध्ये मौलाना मसूद अझहर, हाफीज महंमद सईद, झकी ऊर रहमान लखवी यांसारखे ५० हून अधिक क्रूर आतंकवादी आहेत, पन्नूसारखे खलिस्तानी आतंकवादी परदेशात सुखनैव रहात आहेत आणि तेथूनच भारतात आतंकवादी कारवाया करत आहेत. या आतंकवाद्यांना इस्रायलप्रमाणे घुसून का मारले जात नाही ? किंवा पकडून भारतात का आणले जात नाही ? २६ नोव्हेंबरचे मोठे आक्रमण होते म्हणून त्याची चर्चा होते; पण अन्य लहान-मोठ्या आक्रमणांच्या सूत्रधारांचे काय ? भारतात महाघोटाळे करून पळून जाणार्‍यांचे काय ?

आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगारांना शिक्षा कधी ?

नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोक्सी

आर्थिक घोटाळा करणारा मेहुल चोक्सी याला अनेक वर्षांनंतर परदेशात पकडण्यात आले आहे. तसाच मोठा घोटाळा करणारा नीरव मोदी, आय.पी.एल्.मध्ये घोटाळा करणारा ललित मोदी, बँकांचे पैसे लुटणारा विजय मल्ल्या यांच्याविषयी अन्वेषण यंत्रणा हे घोटाळे उघड होऊन अनेक वर्षे झाली, तरी त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत, म्हणजे भारतात गुन्हा करायचा आणि परदेशी पळून जायचे, ही विकृती निर्माण झाली आहे. त्याला जे मूळ काही असेल, उदा. प्रत्यार्पण करार झालेले नसणे, विदेशातील न्यायालयीन प्रक्रिया, विदेशांतील सरकारचे अभय इत्यादी काही असले, तरी त्यांना शिक्षा न झाल्याने अथवा भारत त्यांचे काही करू शकणार नाही, ही निश्चिती झाल्यामुळे इतरांचे मनोबल वाढत आहे. इस्रायल त्याच्या देशात गुन्हा करून पळून जाणार्‍यांना अन्य देशांत जाऊन एक तर पकडतो किंवा ठार करतो. त्यामुळे गुन्हेगार इस्रायलविषयी १० वेळा विचार करतो. तसे भारतात का होऊ शकत नाही ? भारतासारख्या युवावर्ग अधिक असणार्‍या देशातील अन्वेषण यंत्रणा, पोलीस यंत्रणा, विदेश विभाग येथे कार्यक्षम आणि राष्ट्राभिमान असणारे अधिकारी अन् कर्मचारी यांचा भरणा करू शकत नाही का ? जेणेकरून या विभागांकडून देशाच्या शत्रूंच्या विरोधात वेगाने आणि योग्य पावले उचलून शत्रूंना नेस्तनाबूत करता येईल. भारताचा जगात दरारा किंवा धाक निर्माण होणेच महत्त्वाचे आहे !

भारताला हव्या असणार्‍या क्रूर आतंकवाद्यांना सुरक्षायंत्रणा पाकमध्ये जाऊन कधी पकडणार ?