सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली शेंदूरणी (जिल्हा जळगाव) येथील कु. मनस्वी पाटील !

कु. मनस्वी पाटील

१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा आणि भाव

अ. ‘कु. मनस्वी शिक्षणासाठी बाहेरगावी रहात होती. तेव्हा तिला अकस्मात् तीव्र पायदुखीचा त्रास चालू झाला. त्याची तीव्रता इतकी होती की, तिला रात्रभर झोप येत नव्हती आणि जेवण जात नव्हते. तिने औषधोपचार घेऊनही तिचा त्रास दूर झाला नाही. तेव्हा तिने सद्गुरु नंदकुमार जाधव यांना नामजपादी उपाय विचारले. मनस्वीने सद्गुरु जाधवकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय नियमित केले. त्यामुळे काही दिवसांतच तिचा पायदुखीचा त्रास दूर झाला. ती नामजपादी उपाय करत असतांना तिला अनेक वेळा गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) सूक्ष्मातून दर्शन झाले. तेव्हापासून तिच्या गुरुदेवांप्रतीच्या भावात वृद्धी झाली.

आ. अशाच प्रकारचे त्रास मनस्वीच्या खोलीतील मुलींनाही झाले. तेव्हा त्या घरी गेल्या; मात्र मनस्वीने गुरुदेव आणि सद्गुरु काका यांच्यावर श्रद्धा ठेवून तिथेच राहून नामजपादी उपाय केले आणि ती त्रासातून बाहेर आली.

२. ती शिकवणीवर्गाला जातांना, तिथे गेल्यावर, तेथून परत येतांना, अभ्यासाला बसण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी प्रार्थना करत असे.

३. ‘वसतीगृहामध्ये मिळणारे भोजन हा प्रसाद आहे’, असा भाव ठेवून तो ग्रहण करणे

सौ. स्मिता पाटील

पूर्वी ती वसतीगृहातील जेवणाबद्दल गार्‍हाणे करत असे. नंतर ती ‘वसतीगृहात मिळणारे भोजन प्रसाद आहे’, असा भाव ठेवू लागली. त्यातून तिला आनंद मिळाला आणि तिची सकारात्मकताही वाढली.

४. स्वीकारण्याची वृत्ती

ती मार्च २०२४ या मासात इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी घरी आली होती. १०.२.२०२४ या दिवशी माझ्या सासर्‍यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना भेटण्यासाठी घरी पुष्कळ पाहुणे येत असत. तेव्हा आम्हाला मनस्वीला वेळ देता येत नव्हता. तिने ही परिस्थिती स्वीकारली. तिने गुरुदेवांना प्रार्थना करून शरण जाऊन अभ्यास केला. गुरुकृपेने त्या परीक्षेत तिला पुष्कळ चांगले गुण मिळाले.

५. गुरुदेवांना अपेक्षित असे करण्याची तळमळ

तिला वैद्यकीय पूर्व परीक्षेत (‘नीट’मध्ये) ७२० पैकी ५७४ गुण मिळाले. तेव्हा अनेक जण तिला सांगत होते, ‘‘तू पुन्हा ही परीक्षा दे, म्हणजे तुला ‘एम्.बी.बी.एस्.’ या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल; मात्र ती स्थिर आणि सकारात्मक होती. तिने सांगितले, ‘‘आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेद शाखेत प्रवेश घेणे योग्य आहे. मला आयुर्वेद महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा आहे. त्या दृष्टीने गुरुकृपेने मला तेवढे गुण मिळाले आहेत. मी गुरुदेवांना अपेक्षित असेच करीन.’

– सौ. स्मिता नीलेश पाटील (कु. मनस्वीची आई), शेंदूरणी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव (३०.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक