कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (‘एआय’मुळे) भारताचे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) वाढेल !

भारत सरकारने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ‘एआय’चा योग्य वापर करून भारत स्वतःचा ‘जीडीपी’ लक्षणीयरित्या वाढवू शकतो. अनेक वर्षे भारतातील अत्यंत हुशार विद्यार्थी ‘आयआयटी’मधून उत्तीर्ण झाल्यानंतर अमेरिका किंवा युरोप यांच्या दिशेने वळायचे; परंतु आता अमेरिका आणि युरोप यांमध्ये मोठ्या उच्च पदावर असलेले भारतीय आता भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, म्हणजे थोडक्यात भारतामध्ये ‘रिव्हर्स ब्रेन ड्रेन’ (बौद्धिक गळती न होणे, म्हणजेच भारतियांनी विदेशात न जाता देशातच थांबणे) हे चालू झाले आहे, ज्याचा भारताला नक्कीच मोठा लाभ होत आहे.

१. ‘मायक्रोसॉफ्ट’च्या दृष्टीने ‘एआय’च्या प्रसारासाठी भारत एक महत्त्वाची बाजारपेठ

‘एआय’ हे तंत्रज्ञान जगभरात वेगाने विकसित होत आहे आणि भारतासारख्या देशासाठी यातून अनेक संधी उपलब्ध आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नाडेला यांच्या मते ‘एआय’मुळे भारताच्या ‘जीडीपी’ वाढीला फार मोठी चालना मिळू शकते. भारत आणि अमेरिका यांसारख्या देशांनी ‘एआय’ नियम अन् इतर नियम यांवर सहकार्य करणे आवश्यक आहे.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

सत्या नाडेला यांची ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापन मोठ्या प्रमाणात भारतामध्ये या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे. आपल्याला आठवत असेल की, भारत सरकारने २ वर्षांपूर्वी सत्या नाडेला यांचा ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मान केला होता आणि त्यानंतर ‘मायक्रोसॉफ्ट’चा भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा वेग नक्कीच वाढला आहे. सत्या नाडेला ‘एआय’च्या प्रसारासाठी भारताला एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पहातात. भारतीय ‘इन्फोटेक उद्योगा’सह तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’चे प्रतिस्पर्धीसुद्धा हाच दृष्टीकोन बाळगतात. त्यांच्या अंदाजे ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेतील ५०० अब्ज डॉलर्स (४१ लाख ५० सहस्र कोटी रुपये) हे तंत्रज्ञानाद्वारे सुसज्ज केलेल्या उत्पादकता सुधारणांमुळे असतील.

‘मायक्रोसॉफ्ट’ २ बिलियन भारतियांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) ‘कोडर्स’ना (संगणक प्रणालीसाठीची भाषा लिहिणारी व्यक्ती) प्रशिक्षण देणार आहे; कारण त्यांना वाटते की, ही क्षमता भारतियांमध्ये आहे. याखेरीज इतक्या मोठ्या संख्येमध्ये आणि कमी किमतीमध्ये ‘कोडर्स’  हे फक्त भारतातच मिळू शकतात. नाडेला यांना वाटते की, यामुळे ‘मायक्रोसॉफ्ट’ला पुष्कळ लाभ होईल आणि ‘एआय’मुळे जगात क्रांती होईल. अर्थात् यामुळे भारताचासुद्धा पुष्कळ लाभ होईल; कारण भारताला आपल्या आर्थिक प्रगतीचा दर वाढवायचा आहे.

२. भारताला होणारे लाभ

२ अ. उत्पादकता वाढवणे : अनेक कामे ‘एआय’मुळे स्वयंचलित होऊ शकतात, ज्यामुळे मानवी श्रम आणि वेळेची बचत होते अन् व्यवसायांना अधिक स्पर्धात्मक बनण्यास साहाय्य होईल. उत्पादकता वाढून उत्पादनात आणि सेवांमध्ये वाढ होऊ शकते.

२ आ. दक्षता आणि कार्यक्षमता वाढवणे : ‘एआय’मुळे विविध क्षेत्रांत कार्यक्षमता आणि कार्यप्रणाली सुधारण्यास साहाय्य होते. यामुळे वेळ आणि पैसा यांची बचत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

२ इ. सरकारी सेवांमध्ये सुधारणा : सरकारी सेवांमध्येही ‘एआय’मुळे सुधारणा होतात. सरकारी अधिकार्‍यांना नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा प्रदान करता येतील आणि भ्रष्टाचार न्यून करता येईल.

२ ई. ग्राहकांना चांगल्या सुविधा : ‘एआय’मुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा आणि सेवा उपलब्ध होऊ शकतात. यामुळे ग्राहकांचे समाधान वाढून व्यवसायांना चालना मिळते.

२ उ. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा : आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात ‘एआय’मुळे क्रांती घडवून आणता येईल. यामुळे लोकांचे जीवनमान सुधारून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ‘एआय’मुळे डॉक्टरांना रोगांचे निदान आणि उपचार अधिक चांगल्या प्रकारे करता येतील अन् शिक्षकांना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवता येईल.

२ ऊ. नवीन उद्योग आणि रोजगार निर्मिती : अनेक नवीन उद्योग आणि व्यवसाय ‘एआय’मुळे निर्माण होतील. ‘एआय’ तंत्रज्ञान विकसित करणारे, ‘एआय’वर आधारित उत्पादने आणि सेवा प्रदान करणारे अन् हे तंत्रज्ञान वापरणारे यांमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेची भरभराट होईल. भारताकडे ‘एआय’ क्षेत्रात प्रगती करण्याची मोठी क्षमता आहे. भारतात तरुण आणि कुशल लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या व्यतिरिक्त भारत सरकार ‘एआय’ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. ‘एआय’चा योग्य वापर करून भारताची ‘जीडीपी’ लक्षणीयरित्या वाढवता येऊ शकतो. भारत सरकार आणि उद्योग यांनी या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा लाभ घेणे आवश्यक आहे.

३. एआय तंत्रज्ञानासाठीची काही आव्हाने

३ अ. ‘डेटा’ (माहिती) आणि पायाभूत सुविधा : ‘एआय’ तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात डेटा आणि मजबूत पायाभूत सुविधा यांची आवश्यकता असते. भारतात डेटा गोळा करून तो व्यवस्थापित करणे, हे अजूनही एक आव्हान आहे. सरकारने डेटा गोळा करून तो व्यवस्थापित करण्यासाठी योग्य धोरणे अन् पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे.

३ आ. कौशल्य प्रशिक्षण : या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेले कामगार भारतात मर्यादित आहेत. सरकारने ‘एआय’ शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून आवश्यक कौशल्ये असलेले कामगार सिद्ध करणे आवश्यक आहे.

३ इ. नियामक वातावरण : ‘एआय’ तंत्रज्ञानासाठी योग्य नियामक वातावरण सिद्ध करणे आवश्यक आहे. सरकारने ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर नियंत्रित करण्यासाठी आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी योग्य कायदे अन् नियम बनवणे आवश्यक आहे.

४. भारताच्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) महत्त्वाची !

विशिष्ट तंत्रज्ञान (niche technologies), व्यत्यय आणणारे तंत्रज्ञान (disruptive technologies), कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), ‘क्वांटम संगणन’, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे युद्धपद्धतीमध्ये क्रांती होत आहे आणि हे तंत्रज्ञान रशिया, युक्रेन, हमास, इस्रायल येथे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे अन् ज्यामुळे पारंपरिक शस्त्र म्हणजे लढाऊ विमाने, मोठ्या लढाऊ बोटी, रणगाडे त्यांची मोठी शिकार बनत आहेत. अत्यंत अल्प व्ययामध्ये जुन्या महागड्या शस्त्रांची अत्यंत अल्प किमतीमध्ये शिकार करण्यात येत आहे; परंतु या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा भारतीय सैन्यामध्ये अन् इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर करण्याकरता आपल्याला पुष्कळ संशोधन करावे लागेल. हे संशोधन खर्चिक असते आणि याकरता सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित झालेला निधी सरकारी अन् खासगी आस्थापनांमध्ये वापरला जाईल, यामुळे खासगी आस्थापनांना सुद्धा अल्प व्ययामध्ये भांडवल मिळू शकेल. परिणामी भारताच्या तंत्रज्ञानाचा विकास हा अधिक वेगाने होईल.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

(साभार : दैनिक ‘सामना’, १७.२.२०२४)