जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा

जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता एक व्हावे ! – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

रत्नागिरी – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समाजोपयोगी कार्याचा आणि अनेक उपक्रमांचा लाभ सरकारलाही होत आहे. त्यांच्या या कार्यात सहभागी होण्याचा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तालुक्यातील नाणीज येथील सुंदरगडावर २१ ऑक्टोबर या दिवशी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात चालू झाला. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. या वेळी त्यांच्या हस्ते आणखी १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे संस्थानकडे सेवेत एकूण ५२ रुग्णवाहिका कार्यरत झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृती पूर्ण विकसित आहे. पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा आपण भिन्न आहोत. त्याला कारण येथील संतपरंपराच आहे.

संत समाजाचा विचार करतात. ते सामान्यातील असामान्यत्व जागृत करतात. संतांनी समाजाकरता जगायला शिकवले; म्हणून आपली संस्कृती टिकून आहे. ‘आपण जगायचे आणि दुसर्‍यालाही जगवायचे’ ही जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांची विचारधारा आहे. ते धर्मांतराचे षड्यंत्र नेस्तनाबूत करण्याचे काम सतत करत आहेत.’’

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, नाणीजक्षेत्राला महाराजांनी जगाच्या नकाशावर आणले. धर्म, संस्कृती, पर्यावरण संरक्षण स्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. अपघाताच्या वेळी अनेकदा शासनाच्या रुग्णवाहिकेच्या अगोदर संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी पोचते, एवढी तत्परता येथे आहे.

प्रारंभी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी प्रास्ताविक करून दोन्ही मंत्र्यांच्या कार्याचा गौरव केला. सोहळ्याचे आभार प.पू. कानिफनाथ महाराज यांनी मानले. श्रद्धा बोडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी संतपिठावर औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, उद्योजक किरण सामंत, संपादक उल्हास घोसाळकर, उर्मिला घोसाळकर, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राहुल पंडित, बिपीन बंदरकर उपस्थित होते.

जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता एक व्हावे ! – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

आम्ही हिंदूंनी एकजुटीने राहिले पाहिजे. इस्रायल-हमास युद्धातून आपल्याला भरपूर शिकायला मिळाले. जे यापासून बोध घेणार नाहीत, ते संपणार आहेत; म्हणून मी म्हणत असतो की, ‘हिंदू खतरेमें है’ आपल्याकडे धर्माबद्दल स्वाभिमान अल्प आहे. यहुदी स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली, तर काय होईल? म्हणून जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता तरी एक व्हावे.