(म्हणे) ‘कॅनडातील भारताचा दूतावास बंद करा !’ – कॅनडातील खलिस्तान्यांची मागणी

खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू

ओटावा (कॅनडा) – ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने कॅनडातील भारतीय दूतावास बंद करण्याची धमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. पन्नू याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी-२० परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. भारताने दूतावास बंद केला नाही, तर जस्टिन ट्रुडो यांना झालेल्या अपमानाचा सूड घेतला जाईल, अशी धमकी दिली आहे.

‘जी-२०’ परिषदेत भारत आणि अन्य देश यांनी ट्रुडो यांचा अवमान केल्याचा कॅनडातील माध्यमांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

‘जी-२०’ परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारत आणि इतर देश यांनी महत्त्व दिले नाही आणि त्यांचा अवमान केला, असा आरोप कॅनडातील विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांनी केला आहे. कॅनडाच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, ट्रुडो ‘जी-२०’ नेत्यांसाठी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनालाही उपस्थित राहिले नाहीत. यामागचे कारण कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेले नाही. दुसरीकडे भारतासमवेतच्या द्विपक्षीय चर्चेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रुडो यांना कॅनडातील वाढत्या खलिस्तानी कारवायांना आळा घालण्यास सांगितले.

संपादकीय भूमिका

अशा मागण्यांना कुणी भीक घालेल का ? कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या खलिस्तान्यांवर कारवाई करून ‘ते याविषयी गंभीर आहेत’, हे दाखवून द्यावे !