गेल्या ५ वर्षांत देशात २ लाख ७५ सहस्र मुले बेपत्ता !

  • २ लाख ४० सहस्र मुलांचा लागला शोध !

  • बेपत्ता होणार्‍या मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक !

नवी देहली – केंद्र सरकारच्या अहवालानुसार भारतात गेल्या ५ वर्षांत २ लाख ७५ सहस्र १२५ मुले बेपत्ता झाली आहेत. यांपैकी २ लाख ४० सहस्र मुलांचा शोध घेण्यात आला आहे. बेपत्ता मुलांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. केंद्र सरकारने संसदेत याच्याशी संबंधित प्रश्‍नाचे उत्तर देतांना सांगितले की, देशभरात आतापर्यंत ३५ सहस्र मुले बेपत्ता आहेत. ज्या मुलांचा शोध घेता आला नाही, यामध्ये मध्यप्रदेश आणि बंगाल राज्यांतील मुले सर्वाधिक आहेत. चाइल्ड हेल्पलाइन बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी काम करते.

१. वर्ष २०२१ मध्ये पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत ५३ सहस्र ८७४ गुन्हे नोंदवण्यात आले. मुलांवरील गुन्ह्यांमध्ये प्रत्येक तिसरा गुन्हा पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत नोंदवला जात आहे.

२. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार वर्ष २०२१ मध्ये २ सहस्र ८३४ मुलांची तस्करी झाली. म्हणजे प्रतिदिन ८ मुलांची काम करणे, भीक मागणे आणि लैंगिक शोषण या  उद्देशाने तस्करी झाली. वर्ष २०१८ मध्ये ही संख्या २ सहस्र ९१४, तर २०१९ मध्ये २ सहस्र ९१४ आणि वर्ष २०२० मध्ये २ सहस्र २२२ मुलांची तस्करी झाली. मुलांची तस्करी आखाती देशांपर्यंत होते.

३. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार देशात वर्ष २०२० मध्ये ६६ लाख १ सहस्र २८५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्ष २०२१ मध्ये एकूण गुन्ह्यात १६ टक्के वाढ झाली. वर्ष २०२० मध्ये मुलांवर १ लाख २८ सहस्र ५३१ गुन्हे झाले. वर्ष २०२१ मध्ये हा आकडा १ लाख ४९ सहस्र ४०४ झाला.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारे मुले बेपत्ता होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !