देश अन् धर्म वाचवण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ होते का ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) कि हिंदूंना लक्ष्य करण्याचे साम्यवादी षड्यंत्र ?’

मुंबई – आपल्या देशात हिंदूंविरोधात अनेक राजकीय नेते आणि हिंदुविरोधी लोक नियमितपणे ‘हेट स्पीच’ करत आहेत, त्याविषयी कोणत्याही न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला जात नाही. ‘हेट स्पीच’ म्हणजे काय ?’, याची व्याख्या सुस्पष्ट होणे आवश्यक आहे. सध्या न्यायाधीश निर्णय देतांना कायदे बनवायला लागले आहेत. कायदे बनवणे, हे न्यायाधिशांचे काम नसून ते संसदेचे काम आहे. ‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ?’, असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा यांनी उपस्थित केला. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हेट स्पीच’ कि हिंदूंना लक्ष्य करण्याचे साम्यवादी षड्यंत्र ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन विशेष संवादा’त ते बोलत होते.

‘हेट स्पीच’चा संदर्भ देऊन हिंदु वक्त्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन चॅनल

श्री. सुरेश चव्हाणके

अमेरिकेमध्ये ‘इस्लामोफोबिया’विषयी (इस्लामविषयी तिरस्कार) कायदा करण्यात आला आहे. भारतात असा कायदा करता येणार नाही, म्हणून ‘हेट स्पीच’ ही पुढील आवृत्ती आणली आहे. हिंदूंच्या विविध सभांमधून हिंदूंमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे जिहादी अस्थिर झाले आहेत. हिंदूंच्या सभांत बोलणारे वक्ते, आयोजक यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात आहे. जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त मी केलेल्या भाषणाला ‘हेट स्पीच’चा संदर्भ देऊन माझ्याविषयी तक्रार प्रविष्ट झाली. हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, राष्ट्रप्रेमी काजल हिंदुस्तानी यांना ‘हेट स्पीच’च्या नावाखाली अटक केली होती. या सर्व प्रकारांच्या विरोधात लढाई लढण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक आहे.

हिंदूंवर ‘हेट स्पीच’चे गुन्हे नोंदवले जाणे हे मोठे षड्यंत्र ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. प्रशांत जुवेकर

आम्ही वर्ष २००८ पासून प्रत्येक वर्षी जळगावमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेऊन जनजागृती करत आहोत; पण २५ डिसेंबर २०२२ या दिवशी सभा घेतल्यावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही घटना घडली नाही. तरीही प्रशासनावर दबाव आणून ९ मे २०२३ या दिवशी हिंदूंच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. वर्ष २०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने सभा घेऊन दंगल घडवली; मात्र वक्त्यांवर कोणताही गुन्हा नोंद झाला नाही. धर्मांधांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. जळगावात काही झालेले नसतांना हिंदूंवर ‘हेट स्पीच’चे गुन्हे नोंद होतात, हे मोठे षड्यंत्र आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित न केल्यास त्याचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही ! – अधिवक्ता सुभाष झा

अधिवक्ता सुभाष झा

भारतात हिंदु आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. गेल्या काही दशकांत निर्माण झालेले अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार, पाकिस्तान आदी देश भारतापासून तोडण्यात आले. यातील २ इस्लामी राष्ट्रे झाली. सध्या भारताचे इस्लामीकरण करण्याचा प्रयोग चालू आहे. या देशाचे पुन्हा अनेक तुकडे करून देशाचे विभाजन केले जाईल, या धोक्याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले नाही, तर देशाचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही.