पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

महागाईमुळे पाकच्या नागरिकांची पर्यटनाकडे पाठ

अमृतसर (पंजाब) – भारत-पाक सीमेवर काही ठिकाणी अधिकृतरित्या ये-जा करण्याची प्रवेशद्वारे आहेत. त्यांतील काही ठिकाणी सायंकाळी दोन्ही देशांचे ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. येथे दोन्ही देशांकडील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी भारताच्या बाजूने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात; मात्र पाकच्या बाजूने नागरिकांची संख्या अल्प होऊ लागल्याचे दिसून आले आहे.

पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सादकी या सीमेवर हे कार्यक्रम आयोजित केले जातात. येथे भारतियांकडून घोषणाबाजी करत सैनिकांना प्रोत्साहन दिले जाते. आता येथे पाकच्या बाजूने नागरिक उपस्थित रहात नसल्याने पाकच्या सैन्याचे मनोबल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. हुसैनीवाला येथे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच पाकचे लोक दिसून येत आहे. यामागे पाक आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे कारण सांगितले जात आहे. महागाईमुळे पाकच्या नागरिकांनी पर्यटन बंद केले आहे.

संपादकीय भूमिका

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !