महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होणार ! – पालकमंत्री उदय सामंत

८ कोटी रुपये जिल्हा नियोजनातून देणार !

उदय सामंत

रत्नागिरी – महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प होत आहे. हा प्रकल्प झाल्यावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील २ पथदिव्यांचे वीजदेयक शून्य होणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक आहे की नाही, तो ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी ठरवावा. त्यासाठी ८ कोटी रुपये जिल्हा नियोजनातून देण्यात येणार आहेत. त्यापैकी ३ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग केले आहेत, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पूजार, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, ग्रामसेवक, सरपंच आणि अन्य उपस्थित होते.

शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय आणि जिल्हा परिषद गटस्तरीय ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की,

१. महाराष्ट्राच्या इतिहासात नियोजन मंडळाकडून ग्रामीण भागांतील शाळांमधून विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्च करून मुलांना अमेरिकेला पाठवण्याचे धाडस रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नियोजन मंडळाने केले.

२. शेतकर्‍यांची मुले इस्रो आणि नासाला पाठवण्याचे काम जिल्हा परिषदेने करून रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला ठरला.

३. सरपंच आणि ग्रामसेवक ही गाडीची २ चाके आहेत. ती विश्वासाने चालली पाहिजेत. दोघांनी एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. गावचा विकास व्हायचा असेल, तरी शासनाने ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत.