विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांची हप्ते‘वसुली’ची सूची घोषित केली !

छत्रपती संभाजीनगर येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट !

छत्रपती संभाजीनगर – येथील शहर पोलिसांकडून अवैध धंदे चालू देण्यासाठी हप्तेवसुली करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २ दिवसांपूर्वी केला होता. २० एप्रिल या दिवशी येथे पत्रकार परिषद घेऊन दानवे यांनी पोलिसांची संपूर्ण हप्ते वसुलीची सूचीच माध्यमांसमोर घोषित केली आहे. कोणत्या गोष्टीसाठी कोण किती रुपयांची हप्ते वसुली करतो ? अशा दलालांच्या नावाची सूची दानवे यांनी घोषित केली आहे. प्रतिमासाला ६० लाख ते ८० लाख रुपये संभाजीनगर शहर पोलीस जमा करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांनी गुटखा वसुली, गावठी मद्य वसुली, मटका वसुली, लॉटरी वसुली, लॉजिंग, वाईन शॉप, मुरूम तस्करी, वाळू, गॅस रिफिलिंग वसुली, जुगार वसुली आदींची वसुली सूची दलालांच्या नावांसह पत्रकारांसमोर सादर केली. यामध्ये २० सहस्र रुपयांपासून ते ४ लाख रुपयांपर्यंत दलालांकडून हप्ता वसुली करण्यात येत आहे. हे सर्रासपणे चालू आहे, असे दानवे यांनी सांगितले.

हिंसाचारामागे पोलीस आयुक्त तर नाही ना ?

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या धर्मांधांच्या २ गटांतील वादावरूनही दानवे यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यावर टीका केली आहे. वाद होण्याच्या २ दिवसांपूर्वीच मी मुख्यमंत्र्यांना पोलिसांविषयी पत्र लिहिले होते, तर शहरात हिंसाचाराची घटना व्हावी, असे पोलीस आयुक्तांना वाटत होते. सत्ताधारी पक्षाच्या नादी लागून अशी त्यांची भूमिका असावी अशी आम्हाला शंका आहे. आमची सभा रहित करण्यासाठी हे सर्व होते का ? असाही प्रश्न पडतो.

जेव्हा वादाची घटना घडली, तेव्हा पोलीस आयुक्त तब्बल २ घंटे विलंबाने आले. त्यामुळे हे शहर त्यांना जळून द्यायचे होते का ? अशी शंका आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. रामनवमीच्या एक दिवस आधीच ‘शहरात हिंसाचार होण्याची भीती आहे’, असे मी पोलीस आयुक्तांना सांगितले होते. त्यादिवशी ७ वाजता घडलेली घटना दुर्लक्षित केल्याने रात्री १ वाजता हिंसाचार झाला. पोलीस आयुक्तांना हिंसाचार चालू असतांना कुणाकुणाचे दूरभाष आले, हे त्यांनी सांगावे. आमच्या सारख्यांच्या अनेकांचे दूरभाष, तर त्यांनी घेतलेच नव्हते. या शहरात अवैध धंदे चालू असून त्यांनी सज्जन असण्याचा बुरखा घातला आहे. सर्व अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस हप्ते घेत आहेत.

संपादकीय भूमिका

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व अवैध धंदे आणि हप्त्यासह दलालांची नावे घोषित केली आहेत. हे प्रतिदिन सर्रास चालू असतांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे दुर्लक्ष का केले ? जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हप्तेवसुली करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई का केली नाही ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना अवैध धंदे दिसत नाहीत का ? या प्रकरणातील सर्व दोषी पोलीस कर्मचारी, त्यांकडे कानाडोळा करणारे संंबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !