व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

  • पाकिस्तानकडून विदेशी नागरिकांचा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर होत असल्याची शक्यता !

  • महाराष्ट्रात ५० सहस्रांहून, तर मुंबईत ५ सहस्रांहून अधिक नागरिकांचे अवैध वास्तव्य !

मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – ‘व्हिसा’ संपूनही पुन्हा स्वत:च्या देशात न जाता अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांचा भारतात सुळसुळाट झाला आहे. (व्हिसा म्हणजे एखाद्या विदेशी व्यक्तीला काही कालावधीसाठी देशात रहाण्यासाठी देण्यात येणारे प्रमाणपत्र) थोडीथोडकी नव्हे, तर भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मुंबईमध्ये अमली पदार्थ आणि अन्य गोष्टींची तस्करी यांमध्ये विदेश नागरिक अन् मुसलमान यांचा सहभाग अधिक असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये युवापिढीला व्यसनाधीन बनवून भारताला पोखरण्यासाठी पाकिस्तानकडून विदेशी नागरिकांचा वापर होत असल्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने सुरक्षायंत्रणेने हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

एप्रिल २०२२ मध्ये व्हिसा संपल्यानंतरही भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांची संख्या ४ लाख २१ सहस्र २५५ इतकी होती. महाराष्ट्रात ५४ सहस्र २५९, तर मुंबईमध्ये अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांची संख्या ५ सहस्र ६२३ इतकी होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबईमध्ये अवैधपणे रहाणार्‍या ६२५ नागरिकांना पकडण्यात आले, तर महाराष्ट्रात अवैधपणे रहाणार्‍या नागरिकांपैकी एप्रिलपासून केवळ १८ सहस्र ८३८ नागरिकांचा शोध अन्वेषण यंत्रणांना लावता आला. यामध्ये पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा समावेश नाही. अन्यथा अवैधपणे रहाणार्‍यांच्या संख्येत सहस्रोंची भर पडेल.

मुंबईत वाढत आहेत अमली पदार्थांचे अड्डे !

मुंबईमध्ये प्रतिमासाला अवैधपणे रहाणारे सरासरी ६०० विदेशी नागरिक पकडले जात आहेत, असे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांमध्ये ९० टक्के नायजेरियाच्या नागरिकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त युगांडा, केनिया आणि घाना या देशांतील नागरिकही अवैधपणे भारतात रहात आहेत. मागील काही मासांत मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडले गेले आहेत. खारघर, तळोजा, ठाणे, मीरारोड आणि नालासोपारा येथील काही भाग अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांची केंद्रे झाली असून येथून मुंबईसह इतरत्र अमली पदार्थांची तस्करी होत आहे. हे नागरिक थेट हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना अमली पदार्थांची तस्करी करत आहेत. आर्यन खान याने अमली पदार्थ बाळगल्याचे प्रकरण आणि अभिनेते सुशांत राजपूत मृत्यू प्रकरण यांच्या अन्वेषणातून मुंबईमध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये विदेशी नागरिकच अधिक होते. हे सर्वजण अमली पदार्थांच्या व्यवसायात होते.  त्यामुळे वेळीच कठोर पाऊल न उचलल्यास मुंबईसह देशातील विविध भागांत अमली पदार्थांचे जाळे पसरण्याची भीती आहे.

पोलिसांवरही करतात आक्रमण !

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, अवैधपणे रहाणार्‍या नागरिकांना पकडल्यानंतर त्यांचे नाव काळ्या सूचीत टाकले जाते. त्यामुळे त्यांना पुन्हा भारतात प्रवेश मिळत नाही. व्हिसा संपण्यापूर्वीच हे नागरिक त्यांच्या रहाण्याच्या ठिकाणाहून गायब होतात. अनेकदा हे नागरिक पोलिसांवरच आक्रमण करतात. काही वेळा पोलिसांनाही त्यांच्याकडून मार खावा लागतो. अशा अनेक घटना घडल्या आहेत.

विषय गांभीर्याने घेतला गेला नाही !

या विदेशी नागरिकांची धोकादायक संख्या पहाता त्यांचा शोध घेण्यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये केंद्रीय गृहसचिवांनी प्रत्येक राज्याच्या गृहविभागाच्या प्रधान सचिवांसमवेत बैठक घेतली. यामध्ये प्रत्येक राज्यात व्हिसा संपलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी गृहविभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे.

देशात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या आणि बेपत्ता विदेशी नागरिकांचा आढावा भारत सरकारकडून प्रतिमासाला मागण्यात येतो. त्यामुळे केंद्र सरकारचे याविषयीचे धोरण कडक आहे. प्रत्यक्षात मात्र अवैधरित्या भारतात रहाणार्‍या विदेशी नागरिकांची आकडेवारी अद्यापही मोठी आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?
  • अवैध वास्तव्य करणार्‍या विदेशी नागरिकांमुळेच भारतात आज गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. हेही वास्तव सरकारने लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात कृतीशील व्हावे !