वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित करण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची राष्ट्रघातकी योजना !

केंद्रशासनाने २८ सप्टेंबर २०२२ या दिवशी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’वर बंदी घातली. त्यापूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने २२ सप्टेंबर या दिवशी देशातील जवळजवळ १२ राज्यांत विविध ठिकाणी धाडी टाकत १०० हून अधिक जणांना अटक केली. यानंतर २७ सप्टेंबर या दिवशी अन्वेषण यंत्रणांनी पुन्हा ९ राज्यांमध्ये पी.एफ्.आय.शी संबंधित विविध ठिकाणांवर धाडी टाकत १०० हून अधिक जणांना अटक केली.

भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून स्थापित करण्याचे ‘पी.एफ्.आय.’ या आतंकवादी संघटनेचे जिहादी मनसुबे नुकतेच बिहारमध्ये टाकलेल्या एका धाडीत काही कागदपत्रांच्या माध्यमातून अन्वेषण यंत्रणांच्या हाती लागले आहेत. २८ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पी.एफ्.आय.ने ‘इंडिया-२०४७ : एक हिंसक योजना’ बनवणे आणि भारताला इस्लामी राष्ट्र करण्यासाठीच्या ध्येयप्राप्तीचे ४ टप्पे यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

५. कागदपत्रांमधील कृती आराखडा

एन्.आय.ए.ने बिहारमध्ये धाड टाकली. त्या वेळी सापडलेल्या कागदपत्रांमध्ये पुढील कृती आराखडाही देण्यात आला आहे.

५ अ. सातत्याने तक्रारी करणे : सुदैवाने रा.स्व. संघ, हिंदु संघटना आणि त्यांच्या हातातील बाहुले असणार्या सरकारांमुळे आपल्याला तक्रारीसाठी अनेक कारणे मिळत आहेत. शासन आणि मुसलमान यांच्यात विश्वासाचे वातावरण नाही. बाबरी मशीद, धार्मिक दंगली, मुसलमानांना ठार मारणे यांसारख्या घटना लावून धरल्या पाहिजेत. सगळ्या राज्यांमध्ये ‘संघाचे हे सरकार भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणार आहे आणि मुसलमानांना देशाच्या बाहेर काढणार आहे’, हे पसरवले पाहिजे.

५ आ. मुसलमानांना सक्रीय करणे : शक्य तिथे मुसलमानांना सक्रीय करून ‘पी.एफ्.आय.’ला पाठिंबा मिळवणे. लोकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भांडायला प्रवृत्त करणे.

५ इ. ‘पी.एफ्.आय.’च्या सदस्य संख्येत वाढ करणे : देशातील प्रत्येक घरात ‘पी.एफ्.आय.’ला पोचवणे. संघटना, पक्ष किंवा अन्य विभागांत प्रत्येक कुटुंबातील किमान एक जण भरती करून घेणे. प्रत्येकाला आपल्या मासिकांचा, लेखांचा वाचक म्हणून सिद्ध करणे. आपल्या सोशल मिडियाच्या पोस्ट (सामाजिक माध्यमांतील लिखाण) त्यांच्यापर्यंत पोचवणे. प्रत्येक कुटुंब आपल्याशी जोडले जाईल, हे पहाणे.

५ ई. शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे आणि सदस्य भरती करणे : सध्या या ‘फॅसिस्ट’ (उजवी विचारसरणी) वातावरणात ‘पी.एफ्.आय.’ ही एकटी संस्था चांगली टिकून आहे. संघटनेच्या शारीरिक शिक्षण विभागाचा दबदबाही चांगला आहे. या युक्त्यांनी आपला आत्मविश्वास आणि दृढ निश्चय यांना बळ मिळेल. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत आपण पोचले पाहिजे. योग वर्ग आणि ‘हेल्दी पिपल, हेल्दी नेशन’ (सुदृढ नागरिक, सुदृढ राष्ट्र) या संकल्पनेच्या आड राहून संघटनेचा शारीरिक शिक्षण विभाग सक्रीय ठेवावा. आपले प्रशिक्षक राज्यांमध्ये जाऊन शस्त्रास्त्रे आणि स्फोटके चालवण्याचे प्रशिक्षण देत रहातील. मुसलमानबहुल वसाहतींमध्ये जागा घेऊन किंवा दूरच्या ठिकाणी शस्त्रसाठा करावा आणि प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून ते सुरक्षा यंत्रणांना कळणार नाही. यांचा ठावठिकाणा अगदी ठराविक जणांना ठाऊक असावा.

५ उ. हिंदुत्वनिष्ठ आणि संघ परिवारातील नेते यांची माहिती मिळवणे : हिंदुत्वनिष्ठ आणि संघ परिवाराचे नेते यांची सगळी माहिती जमवणे. त्यांची वैयक्तिक माहिती आणि कार्यालये यांची माहिती मिळवणे. हा ‘डेटाबेस’ (माहिती) अद्ययावत करत रहावा. यामुळे आपल्याला स्वतःचे ध्येय गाठतांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

६. ‘पी.एफ्.आय.’च्या देशघातकी आणि हिंदुविरोधी कटाचा सारांश

या कागदपत्रातील काही ठळक मुद्दे पाहिल्यानंतर हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे की, इस्लामी जिहाद्यांना भारतात स्वत:चे राज्य प्रस्थापित करायचे आणि त्यासाठी ‘पी.एफ्.आय.’ ही संघटना नेतृत्व करत आहे. यापूर्वीही सिद्ध झाले आहेच की, या संस्थेचा भारताच्या लोकशाही मूल्यांवर विश्वास नाही. या कागदपत्रांवरून थोडक्यात अधोरेखित झालेले मुद्दे हे खालीलप्रमाणे –

अ. हिंदु धर्मातील जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणे. त्यांच्यामध्ये अविश्वास वाढवून एस्.सी., एस्.टी. अन् ओबीसी यांना इस्लामकडे वळवणे.

आ. इस्लामिक मूल्ये समाजात प्रस्थापित करणे आणि प्रसंगी त्यासाठी हिंसेचा अंगीकार करणे. देशातील सामान्य जनतेचा जीव धोक्यात घालून अवैधपणे शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणे.

इ. लोकशाही मूल्यांना स्थान नसणे. जाणीवपूर्वक समस्या निर्माण करून ‘अन्याय झाला होता’, असे म्हणत विविध मुद्यांचे भांडवल करणे.

ई. इस्लामी राज्यात धर्म आणि जात यांवर आधारित उच्च पदांची भरती करणे.

उ. इस्लामच्या आधारावर परकीय राष्ट्रांचे साहाय्य घेणे.

ऊ. रा.स्व. संघाचे आणि हिंदुत्वनिष्ठ नेते अन् कार्यकर्ते यांना संपवणे.

ए. मुसलमानांचीही भारतीय नागरिक म्हणून नव्हे, तर इस्लामी ओळख प्रस्थपित करणे आणि तीच त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करणे.

ही सगळी देशघातकी आणि हिंदुविरोधी योजना सुरक्षायंत्रणांच्या कारवाईमुळे उघड झाली. खरेतर या कागदपत्रांच्या पहिल्या आवृत्तीवर ‘वर्ष २०१६’ असे छापले आहे, म्हणजे यापूर्वीच या सगळ्या कटकारस्थांनाचे नियोजन आणि कार्य चालू झालेले असू शकते.

७. भारताचे अफगाणिस्तान न होण्यासाठी हिंदूंनी सावध आणि सतर्क रहाणे आवश्यक !

वरील सर्व गोष्टी लक्षात घेता भारतीय जनतेने विशेषत: हिंदु जनतेने अतिशय सावध रहाणे आवश्यक आहे, तसेच देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवण्यासाठी जातीभेदांच्या पलीकडे जाऊन विचार करणे क्रमप्राप्त आहे. देशहिताच्या निर्णयांना ‘इस्लामविरोधी निर्णय’ किंवा ‘अल्पसंख्यांकविरोधी निर्णय’, असे सरसकट लेबल लावून तसा अपप्रचार का केला जातो ? याचा आता खोलवर जाऊन विचार केला गेला पाहिजे. प्रसारमाध्यमांना हातचे खेळणे बनवून स्वतःचे ‘साध्य’ प्राप्त करण्यासाठी अशा कितीतरी देशविघातक संघटना कार्यरत असू शकतात आणि आहेतही; म्हणूनच भारतातील लोकशाही अबाधित राखण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आता सावध राहिले पाहिजे. याचसमवेत ‘हिंसा करणे’, हा त्यांच्या कार्यसिद्धीचा भाग आहे, हे या कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे आणि ते अतिशय गंभीर आहे.

एकूणच काय तर देशातील आतंकवादाची रूपे आणि त्यांची कार्यपद्धत वेगाने पालटते आहे. अशा वेळी सामान्य नागरिकांची जागरूकता ही सुरक्षायंत्रणांना साहाय्यक ठरणारी आहे, अन्यथा स्वार्थी, आत्मकेंद्रित विचारांमुळे भारताचे रूपांतर अफगाणिस्तानमध्ये व्हायला फारसा वेळ लागणार नाही !

– रूपाली कुळकर्णी-भुसारी (साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)

‘पी.एफ्.आय.’ची स्थापना कधी झाली ?

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’ची निर्मिती वर्ष १९९३ मध्ये स्थापन झालेल्या ‘नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट’मधून झाली. वर्ष १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट नावाच्या संघटनेची स्थापना झाली होती. ती वर्ष २००६ मध्ये ‘पी.एफ्.आय.’मध्ये विलीन झाली. अधिकृतपणे या संघटनेचा प्रारंभ १७ फेब्रुवारी २००७ या दिवशी झाली. याचे संपूर्ण नियंत्रण केरळमधून होते. असे असले, तरी त्यांचे संपूर्ण देशभरात जाळे आहे. ‘पी.एफ्.आय.’ला ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘सिमी’चा पर्याय मानले जाते.

‘पी.एफ्.आय.’वरील अन्य आरोप

अ. असे म्हटले जाते की, या संघटनेचे ‘केरळ मॉड्यूल’ (प्रमाणित पद्धत) ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेसाठी काम करते. केरळमधून या संघटनेचे सदस्य सीरिया आणि इराक येथील ‘इसिस’मध्ये सामील झाले होते.

आ. देशात दंगल घडवणे, राजकीय हत्या आणि लव्ह जिहाद या प्रकरणी या संघटनेचे नाव समोर आले आहे.

इ. वर्ष २०१० मध्ये केरळमधील एक प्राध्यापक टी.जे. जोसेफ यांना लक्ष्य (टार्गेट) करण्यात आले होते. त्यांनी प्रश्नपत्रिकेवर ‘महंमद’ असे लिहिले होते. त्यावर धार्मिक भावना दुखावल्या कारणाने त्यांचा हात कापण्यात आला होता. एखाद्या प्रकरणात ‘पी.एफ्.आय.’चे नाव समोर येण्याची ही पहिली घटना होती.

ई. ‘पी.एफ्.आय.’च्या अबिद पाशा आणि त्याच्या टोळीने म्हैसुरू (कर्नाटक) येथील रा.स्व. संघ अन् भाजप यांच्या ८ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या क्रूर हत्या केल्याचे उघड झाले आहे.

उ. वर्ष २०१६ मध्ये बेंगळुरू (कर्नाटक) येथील रा.स्व. संघाचे रूद्रेश यांच्या हत्येप्रकरणीही ‘पी.एफ्.आय.’चा हात असल्याचे ‘एन्.आय.ए.’ने सांगितले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेले ४ जण ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित होते.

ऊ. कर्नाटकमधील विघ्नेश अन् सुधींद्र या बंधूंचे अपहरण करून खंडणीची मागणी करत त्यांची हत्या करण्यात आली. मार्च २०१६ मध्ये भाजपचे के. राजू यांची हत्या यांसारख्या अनेक प्रकरणांत ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित अबिद पाशा आणि त्याच्या २५ जणांच्या टोळीचा हात होता.

ए. कन्नूर जिल्ह्यात (कर्नाटक) ‘पी.एफ्.आय.’कडून एक ट्रेनिंग कॅम्प (प्रशिक्षण केंद्र) चालवण्यात येत होता, असा आरोप करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये तलवार, बाँब, पिस्तुल आणि अन्य गोष्टी सापडल्या होत्या.

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’)

भारताचे ‘दार-उल्-इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) करण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या अनेक इस्लामी संघटनांच्या योजना सिद्ध असतील की, ज्या कुणालाच ठाऊक नसतील. त्यामुळे त्यांच्या सर्व प्रकारच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. देशाच्या सर्व सीमा सुरक्षित करून घुसखोरी रोखावी लागेल, तसेच घुसखोरी करून देशात रहाणार्यांना शोधून काढून त्यांना तातडीने परत पाठवायला हवे किंवा त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई करायला हवी. या उपाययोजना तात्काळ केल्या नाहीत, तर भविष्यात अराजक माजून गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल.

– भरत आमदापुरे (साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)