पौष आणि माघ या मासांतील (३०.१.२०२२ ते ५.२.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘२.२.२०२२ या दिवसापासून माघ मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. २.२.२०२२ पासून माघ मास, शुक्ल पक्ष आणि शिशिरऋतू चालू होणार आहे.

(साभार : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. ३०.१.२०२२ या दिवशी सायंकाळी ५.२९ पासून उत्तररात्री ३.५४ पर्यंत आणि ४.२.२०२२ या दिवशी सायंकाळी ४.०७ पासून उत्तररात्री ३.४७ पर्यंत विष्टी करण आहे.

२ आ. दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्‍या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. सोमवार, ३१.१.२०२२ या दिवशी दुपारी २.१९ पासून १.२.२०२२ या दिवशी सकाळी ११.१६ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे. ही अमावास्या सोमवारी असल्याने ‘सोमवतीयोग’ होतो. सोमवती अमावास्या तिथीला तीर्थस्नान, अश्वत्थपूजन आणि विष्णुपूजन करतात.

२ इ. मृत्यूयोग : रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी आश्लेषा आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘मृत्यूयोग’ होतो. हा योग प्रयाणास किंवा कोणत्याही शुभ कार्यास वर्ज्य करावा. सोमवार, ३१.१.२०२२ या दिवशी रात्री ९.५७ पर्यंत उत्तराषाढा नक्षत्र असल्याने मृत्यूयोग आहे.

२ ई. धर्मबीज : माघ शुक्ल द्वितीया तिथीला ‘धर्मबीज’ असे म्हणतात; कारण या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथाला अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्या वेळी सर्व देवीदेवता उपस्थित होते. श्री गोरक्षनाथांनी ‘किमयागिरी’ या ग्रंथात लिहिले आहे, ‘जो कुणी धर्मबीज व्रत श्रद्धेने करील, त्यांच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी विघ्ने दूर होतील.’ २.२.२०२२ या दिवशी धर्मबीज आहे.

२ उ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन ‘चंद्रकोर’ रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ‘ब्रह्मा’ आहे. २.२.२०२२ या दिवशी सायंकाळी ७.५२ पर्यंत चंद्रदर्शन आहे.

२ ऊ. दग्धयोग :  रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २.२.२०२२ या दिवशी बुधवार असून उत्तररात्री ३०.१६ (३.२.२०२२ या दिवशी सकाळी ६.१६) नंतर तृतीया तिथी आहे. (टीप १)

२ ए. श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी (शिवपूजन) : माघ शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला ‘श्री गणेश जयंती’ साजरी करतात. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असे म्हणतात. या दिवशी कुंदपुष्पांनी शिवपूजन करतात. ४.२.२०२२ या दिवशी श्री गणेश जयंती आहे.

२ ऐ. वसंतपंचमी, श्री पंचमी : माघ शुक्ल पक्ष पंचमीला ‘वसंतपंचमी’ असे म्हणतात. या पंचमीला देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचे पूजन करतात; म्हणून या पंचमीला ‘श्री पंचमी’ असे म्हणतात. या दिवशी रति आणि कामदेव यांचे पूजन केले जाते. ५.२.२०२२ या दिवशी वसंतपंचमी आहे.

२ ओ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ५.२.२०२२ या दिवशी उत्तररात्री ३.४७ पासून ६.२.२०२२ या दिवशी दुपारी १.२३ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.

टीप २ – शिवरात्री, भद्रा (विष्टी करण), दर्श अमावास्या, अन्वाधान, इष्टि, दग्धयोग, क्षयदिन, विनायक चतुर्थी, चंद्रदर्शन आणि घबाड मुहूर्त यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.१.२०२२)