हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर कसे सुरक्षित राहील ? – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांची हानी होते. जर हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल, तर मुसलमानही सुरक्षित असेल. जर हिंदूचे घर सुरक्षित असेल, तर मुसलमानाचे घरही सुरक्षित राहील. आम्ही ५ वर्षांत एकही दंगल होऊ दिली नाही, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले,

१. वर्ष १९९० मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध राजकीय पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी श्रीरामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले. केवळ वर्ष १९९० मध्येच नाही, तर त्यानंतरही समाजवादी पक्षाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा कुणालाही सुरक्षित वाटत नव्हते. समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात उत्तरप्रदेश राज्य दंगलीच्या आगीत जळत होते. आज आपण म्हणू शकतो की, ‘आम्ही राज्य दंगलमुक्त केले.’

२. भूतकाळातील वैभवाची पुनर्स्थापना करण्याची मोहीम चालवली जात आहे. आपल्याला भारत आणि भारतीयत्व यांचा अभिमान वाटावा, याचा अयोध्या अन् काशी हा भाग आहे. आम्ही मथुराही बनवू. ज्यांच्यामध्ये दम असेल, तेच मथुरा बनवतील.

राममंदिर हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भाग ! – योगी आदित्यनाथ

काही लोक म्हणत होते की, श्रीरामजन्मभूमीचा निकाल आला, तर रक्ताच्या नद्या वाहतील. त्यांनी पाहिले आहे की, आम्ही कशा पद्धतीने भव्य राममंदिर उभारण्याच्या दिशेने अग्रेसर झालो आहोत. राष्ट्रवाद ही आमची कार्यसूची आहे. राममंदिर हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भाग आहे. विश्‍वनाथ धाम आणि कुंभ हेही त्याचाच भाग आहेत. ‘पवित्र भूमी भव्य-दिव्य बनवणे’, हा आमच्या राष्ट्रवादाचा भाग आहे.