राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.६.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

हिंदु धर्माची यथार्थ बाजू लोकांना सांगण्याची आवश्यकता !

‘आज आम्हाला सर्व बाजूंनी जमेल तसा, जमेल त्या प्रकारच्या साधनांचा अवलंब करावा लागेल. माध्यमांचा अवलंब करावा लागेल. तन, मन आणि धन वेचून हिंदु धर्माची यथार्थ बाजू आणि यथार्थ धर्म लोकांना सांगावा लागेल.’ – गुरुदेव  डॉ. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०१३)

अशा काँग्रेसला निवडून देणारी जनताही गुन्हेगार आहे !

​‘पाकमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदु, शीख आदी अल्पसंख्यांकांचे राजस्थान सरकारकडून लसीकरण होत नव्हते. हे लक्षात आल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने राज्यातील काँग्रेस सरकारला यावरून फटकारले आहे. न्यायालयाने २८.५.२०२१ या दिवशी लसीकरण करण्याचा आदेश देऊनही सरकारने त्याचे पालन का केले नाही ? याचे उत्तर न्यायालयाने सरकारकडे मागितले आहे.’

दंड उत्तरदायी व्यक्तीकडून वसूल करा, विभागाकडून नको !

​‘फातोर्डा (गोवा) येथील शेतात उघड्यावर सांडपाणी सोडल्याच्या प्रकरणी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता यांना १ कोटी १८ लक्ष रुपये दंड ठोठावला आहे.’

सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ? जनतेने लक्ष वेधले, तरी कृती न करणार्‍या उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांना आजन्म कारागृहात टाका !  

‘विशाळगडावर अतिक्रमण केल्याच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर येथे १४ मार्च २०२१ या दिवशी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. १६ मार्च या दिवशी कृती समितीने पहिल्यांदा कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन या विषयाला वाचा फोडली. यानंतर कृती समितीने कोल्हापूर येथे घंटानाद आंदोलन केले, राज्यभर ‘ऑनलाईन’ आंदोलन, तसेच विविध जिल्ह्यांत निवेदने देण्यात आली.’