‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप भावाच्या स्तरावरील असणे

२० जून २०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य करणारा ‘निर्विचार’ हा जप ऐकून काय जाणवते ? हे कळवा’, या मथळ्याची चौकट प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये शक्ती, भाव, आनंद, चैतन्य आणि शांती यांपैकी कोणत्या टप्प्यावर जाणवते, हे प्रयोग करून अनुभवण्यास सांगितले होते.

प्रयोगाचे उत्तर : ‘आरंभी हा नामजप भावाच्या टप्प्यावरील आहे.’

हा जप केल्यानंतर अनेक साधकांची भावजागृती होऊन निर्विचार स्थितीकडे जाण्यास साहाय्य होत असल्याचे जाणवले आणि साधकांना तशा अनुभूतीही आल्या आहेत. तसेच ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या तिन्ही नामजपांविषयी करण्यात आलेले संशोधन, तसेच हा नामजप शक्ती, भाव, आनंद, चैतन्य आणि शांती यांतील स्तरांचे केलेले तुलनात्मक विश्लेषण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारे असूनही ते भावाच्या स्तरावरील का ?

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधक निर्गुण स्थितीला जाईपर्यंत त्याच्या मनात भाव असतोच, तसेच मनाला भावाची सवय असतेच. त्याचा लाभ घेऊन हा नामजप भावाच्या स्तरावर केल्यास या नामजपाचे फळ अधिक प्रमाणात मिळते. यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभाग समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेले ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप भावाच्या स्तरावरील आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी का करू नयेत ?

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारे आहेत. आध्यात्मिक त्रास असणारा साधक हे नामजप करू लागल्यास त्याला वाईट शक्तींकडून विरोध होऊ शकतो. हा विरोध तीव्र स्वरूपाचा झाला, तर त्रास असणार्‍या साधकाच्या त्रासाची तीव्रता वाढू शकते आणि त्यासाठी संतांना नामजप करण्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. यासाठी त्रास असणार्‍या साधकाने त्याचा त्रास न्यून होण्यासाठी असणारा नामजपच करावा.

६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असणारे आणि आध्यात्मिक त्रास असणारे साधक हा नामजप त्यांना असणार्‍या जपाच्या एकूण वेळेपैकी २० टक्के वेळ करू शकतात.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार नामजपांची केलेली निर्मिती !

‘निर्विचार’ नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ वर उपलब्ध !

‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा ?’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करून सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘चैतन्य ॲप’ (सनातन चैतन्यवाणी) या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

हे नामजप पुढील लिंकवर उपलब्ध आहेत

https://www.sanatan.org/mr/a/79145.html

‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करून नामजप ऐका : https://www.sanatan.org/Chaitanyavani

वरील ‘क्यूआर् कोड स्कॅन’ करून ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करू शकता.

हे नामजप ऐकतांना आपणांस काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास आम्हाला [email protected] या ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवा.

‘क्यूआर कोड’ (QR Code) म्हणजे काय ?

‘क्यूआर कोड’ (QR Code अर्थात् Quick Response Code) हे ‘बारकोड’प्रमाणेच एक सांकेतिक चिन्ह आहे. हा कोड कोणत्याही संकेतस्थळाच्या मार्गिकेचा अर्थात् ‘वेबसाइट लिंक’चा बनवता येऊ शकतो. हा कोड एकदा एका ‘लिंक’साठी बनवला की, तो त्याच लिंकसाठी वापरता येतो, म्हणजेच प्रत्येक ‘लिंक’साठी वेगळा आणि एकमेव असा असतो. हा कोड आपल्या भ्रमणभाषद्वारे वाचण्यासाठी भ्रमणभाषमधील कॅमेर्‍याचा उपयोग करावा लागतो. नव्याने उपलब्ध होणार्‍या भ्रमणभाषमध्ये याची सुविधा अंतर्भूतच केलेली (बाय डिफॉल्ट) असते. ज्या भ्रमणभाषमध्ये अशी सुविधा अंतर्भूत नसते, त्यांच्यासाठी ‘क्यूआर कोड स्कॅनर’ नावाने अनेक ‘ॲप्लिकेशन’ ऑनलाइन उपलब्ध असतात. ते ‘गूगल प्ले स्टोअर’द्वारे सहजतेने डाऊनलोड करून घेऊन वापरता येते.

टीप : ‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध ‘ॲप्स’पैकी bit.ly/2PaaflX या मार्गिकेवर असलेल्या ‘Kaspersky QR Code’ या ॲपचा विचार प्राधान्याने करता येऊ शकतो.

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.