(म्हणे) ‘आम्हाला बोलूच दिले नाही !’ – ममता बॅनर्जी यांचा आरोप

कोलकाता – पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, या बैठकीला १० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मीही उपस्थित होते. त्यामुळे मी जिल्हाधिकार्‍यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही. भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांची सूत्रे मांडली; मात्र मला बोलण्याची संधी मिळाली नाही.

सर्व मुख्यमंत्री केवळ गप्प बसून होते. कुणीही काहीही बोलले नाही. आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती; मात्र बोलूच दिले गेले नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, कोरोना संसर्ग न्यून होत असल्याचे मोदी म्हणाले; मात्र आधीही असेच झाले होते. आम्ही ३ कोटी लसीची मागणी करणार होतो. या मासामध्ये २४ लाख लसी मिळणार होत्या; मात्र केवळ १३ लाख लसी मिळाल्या.