राज्याच्या ५, तर सोलापूर जिल्ह्याच्या २३ ठिकाणी असणार नाकाबंदी !


सोलापूर – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नवीन आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करणार्‍यांना परवान्याविना प्रवास करता येणार नाही. त्या दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राज्याच्या ५, तर जिल्ह्याच्या २३ अशा एकूण २८ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. मोठ्या शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून नियम तोडणार्‍या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा देणारी वाहने आणि अन्य कर्मचारी यांना राज्य किंवा जिल्हा प्रशासनाकडून पास देण्यात आले आहेत. पास असतील तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी चेतावणीही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.