आंतरधर्मीय विवाहाला बळी पडणार्‍या हिंदु युवतींसाठी समुपदेशनाची आवश्यकता ! – विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी, पेजावर मठ

भारतात रामराज्य आणण्यासाठी हिंदूंनी प्रण आणि प्रयत्न करणे आवश्यक !

विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी, पेजावर मठ

शिवमोग्गा (कर्नाटक) – आपल्या कुटुंबातील मुली अन्य धर्मियांच्या आमिषाला बळी पडत आहेत. हिंदु धर्माची वृद्धी होण्याच्या संदर्भातील ही मोठी अडचण आहे. जीवनातील अडचणींना तोंड देण्यास असमर्थ असलेल्या मुली आत्महत्या करत असल्याचेही पहात आहोत. त्यासाठी मातृसंघाची आवश्यकता आहे, असे सुचवत आहे. वधू-वर शोधणे त्रासाचे झाल्यावर आंतरधर्मीय विवाह करून पीडित होणार्‍या हिंदु युवतींसाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे. अशा संकटात सापडलेल्या महिलांशी बोलून त्यावर उपाय काढण्यासाठी मातृसंघाची स्थापना केली पाहिजे. महिलांच्या समस्या ऐकून घेणारी ही संस्था त्यांची समस्या ऐकून घेईल. समस्येसाठी योग्य उपाय सुचवता येईल, असे मत उडुपी येथील पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी यांनी व्यक्त केले. शिवमोग्गा येथे प्रवचनासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आंतरधर्मीय विवाहासाठी ब्राह्मण युवतींना लक्ष्य करण्यात येत असल्यावरून त्यांनी वरील मत मांडले.

केवळ श्रीराममंदिर उभारल्याने रामराज्य येणार नाही, ते आपण आणले पाहिजे !

विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी पुढे म्हणाले की, आपले ध्येय केवळ श्रीरामंदिर उभारणे एवढेच न रहाता त्याच्या व्यवस्थापनाचा विचारदेखील झाला पाहिजे. मंदिर पुन्हा नष्ट न होता टिकवून ठेवण्यासह ते आपल्या परंपरेचे प्रतीक झाले पाहिजे. धर्मासह संस्कृती टिकली, तरच त्याला अर्थ असतो. आमच्या मुलांच्या अभ्यासक्रमात श्रीरामाचा धडा असला पाहिजे. पुराण-प्रवचने सांगितली पाहिजेत. केवळ श्रीराममंदिर उभारल्याने रामराज्य येणार नाही. आपण सर्वांनी रामराज्य येण्यासाठी प्रण केला पाहिजे.