काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या मुसलमान कार्यकर्त्याला संतप्त धर्मांधांनी समाजातून केले बहिष्कृत !

हा आहे धर्मांधांचा सर्वधर्मसमभाव आणि राज्यघटनेविषयीचा आदर ! याविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – अब्दुल मुनाफ ऐनापुरी हे गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ७ मार्च २०२१ या दिवशी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे संतप्त झालेल्या ‘जमात’च्या (स्थानिक मुसलमानांची संघटना) प्रमुखांनी अब्दुल मुनाफ ऐनापुरी यांना त्यांच्या समाजातून बहिष्कृत केले असून त्यांना अमानवीय वागणूक दिली जात आहे. वक्फ बोर्डाचे असलेले दुकान रिकामे करण्यासाठी त्यांना नोटीस देण्यात आली आहे; एवढेच नव्हे, तर त्यांना मानसिक त्रासही देण्यात येत असल्याचा आरोप अब्दुल मुनाफ ऐनापुरी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीला चिकित्सालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या घरातल्या लोकांशी शेजारची  लोक बोलणे टाळत आहेत. ‘बडा जमात’कडूनदेखील त्यांचा मानसिक छळ करण्यात येत असल्याचे अब्दुल मुनाफ ऐनापुरी यांनी सांगितले आहे.

ऐनापुरी म्हणाले की, गेली १० वर्षे मी काँग्रेसमध्ये काम करूनही त्याची नोंद घेण्यात आली नाही. काँग्रेस प्रमुखांच्या वर्तनाला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कितीही मानसिक त्रास दिला, तरी मी माझ्या मतापासून ढळणार नाही. वक्फ बोर्डाने दिलेले दुकान ८ दिवसांत रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली असली, तरी मी ते रिकामे करणार नाही. याविषयी वक्फ बोर्डाला पत्र लिहिणार आहे.