मद्यधुंद अ‍ॅपे रिक्शा चालकाच्या धडकेने २ वर्षांची मुलगी ठार !

मद्यपान करणार्‍यास कितीही कठोर शिक्षा दिली, तरी अपघातातील हानी भरून निघणार नाही. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

संतप्त जमावाने रिक्शा पेटवली

सातारा, ५ मार्च (वार्ता.) – येथील कळंबे गावातील मद्यधुंद अ‍ॅपे रिक्शाचालकाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात २ वर्षांच्या अन्वी विकास इंदलकर हिचा मृत्यू झाला, तर वृद्ध महिला आणि ४ वर्षांचे बालक गंभीर घायाळ झाले. २ मार्चच्या रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. आकले गावातील प्राण काशिनाथ पवार या अ‍ॅपे रिक्शाचालकाने रिक्शासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी जमलेल्या जमावाने रिक्शाचालकास पाठलाग करून पकडून आणले. या वेळी रिक्शाचालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. संतप्त जमावाने रिक्शाचालकास बेदम चोप देत रिक्शात उसाचे पाचट घालून रिक्शा पेटवून दिली. जमावाने त्याला पोलिसांच्या कह्यात दिले असून त्याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.