चीनच्या मोठ्या धरणामुळे मेकांग नदी सुकल्याने ५ देशांतील ७ कोटी लोकांवर दुष्परिणाम !

चीनकडून ब्रह्मपुत्रानदीवरही धरणे बांधली जात असल्याने भविष्यात भारताच्या ईशान्य भारतातही अशी स्थिती आल्यास आश्‍चर्य वाटू नये ! असे होऊ नये, यासाठी भारत सरकारने पावले उचलणे आवश्यक !

मेकांग नदी

बीजिंग (चीन) – दक्षिण-पूर्व आशियातील ‘गंगानदी’ अशी ओळख असणार्‍या मेकांग नदीचा प्रवाह चीनकडून धरण बांधून रोखण्यात आला होता. त्याचा परिणाम कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम या ५ देशांतील ७ कोटी लोकांवर होण्यास प्रारंभ झाला आहे. चीनने मोठ्या क्षमतेची धरणे बांधत पाणी अडवण्याचे प्रयत्न चालू केल्याचा हा परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे.

१. थायलंड-लाओसच्या सीमेवर मेकांग नदी ही महत्त्वपूर्ण जलमार्गाचे काम करते; मात्र जलस्तर घटल्याने नौका चालवणे कठीण झाले आहे. नदीचा प्रवाह रोखल्यामुळे मेकांग नदीच्या पाण्याचा रंगही पालटला आहे. चीनने युनान प्रांतात जिगहोंग धरणात पाणी अडवल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जाते.

२. मेकांग नदी पूर्व आशियात ७ कोटी लोकांची जीवनरेखा आहे. कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम येथील प्रसारमाध्यमांनी देशातील दुष्काळाविषयी अनेक वृत्त प्रसारित केली आहेत. यामध्ये दुष्काळासाठी चीनला दोषी ठरवण्यात आले आहे. चीन त्याच्या जलविद्युत प्रकल्पासाठी आणि सिंचनासाठी मेकांग नदीच्या ४७ अब्ज क्युबिक मीटर पाण्याचा वापर करत आहे.