कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ व्यापार्‍यांनाच प्रवेश

कल्याण-डोंबिवलीत ४ ठिकाणी उपलब्ध होणार भाजीपाला !

कल्याण, २७ मार्च (वार्ता.) – दळणवळण बंदीनंतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाकी सगळी दुकाने बंद आहेत. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन २०० ते २५० भाजीपाल्याचे ट्रक येतात. पहाटे ५ ते ८ वाजेपर्यंत तेथे बरीच गर्दी होतेे. ही गर्दी टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये ४ ठिकाणी नागरिकांसाठी आणि किरकोळ व्यापार्‍यांसाठी हा घाऊक भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण पश्‍चिमेतील फडके मैदान, वायले मैदान आणि रामबाग येथील मॅक्सी मैदान, तसेच डोंबिवलीतील ठाकूर्ली येथील ९० फूट रस्ता येथे भाजीपाल्याचे ट्रक जाणार आहेत. नागरिकांसाठी ही सोय करण्यात आली आहे. ए.पी.एम्.सी. मार्केटमध्ये फक्त व्यापार्‍यांना प्रवेश देण्यात येणार आहे.