श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली ! – ह.भ.प. भागवताचार्य माधवदास राठी महाराज

संगमनेर (अहिल्यानगर) येथे विहिंपचे भव्य हिंदु संमेलन पार पडले !

हिंदु संमेलनात उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – श्रीराम जन्मभूमीचे आंदोलन हे हिंदु अस्मितेचे आंदोलन होते. या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली. या आंदोलनामुळे देशात मोठे परिवर्तन झाले. हिंदूंना डावलून कुणीही यशस्वीपणे राजनीती करू शकणार नाही, अशी ताकद निर्माण झाली आहे. आता हिंदु समाज आर्थिक सामर्थ्यशाली होण्यासाठी विहिंप काम करत आहे, असे प्रतिपादन प. महा. प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख ह.भ.प. भागवताचार्य माधवदास राठी महाराज यांनी केले. विहिंपच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त संगमनेरमध्ये मालपाणी लॉन्स येथे ४ सप्टेंबर या दिवशी आयोजित हिंदु संमेलनात ते बोलत होते. हिंदु संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. प्रवीण पानसरे यांनी भूषवले. माधवदास राठी महाराज यांनी विहिंपच्या ६० वर्षांतील वाटचालीचा या वेळी आढावा घेतला.

आता धर्मांध लव्ह जिहाद, लँड जिहाद असे १८ प्रकारचे जिहाद करत असल्याने सर्व हिंदु समाजाने संघटित होऊन प्रतिकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन धर्माचार्य विजय बाळाराजपूरकर महानुभाव (भोर महाराज) यांनी केले.

कलियुगात स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न होत असेल, तर ‘माता-भगींनीनी महिषासुरमर्दिनीदेवीप्रमाणे अशा राक्षसांचा शिरच्छेद केला पाहिजे’, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय ब्रह्माकुमारी अनिता दिदी यांनी केले.

या वेळी विविध मान्यवर संगमनेर तालुक्यातील विहिंप बजरंग दलाचे ३६ शाखांचे पदाधिकारी आणि सहस्रों हिंदू यांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडले. संत संमेलनात विहिंप बजरंग दल, संगमनेर प्रखंड नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

हिंदु संमेलनात व्यासपिठावर उपस्थित मान्यवर