हिंदूंनो, तीर्थक्षेत्रांकडे केवळ पर्यटन म्हणून न पहाता त्यांचा आध्यात्मिक दृष्टीने लाभ करून घ्या !

‘अनेक तीर्थक्षेत्रांनी पावन झालेली भारतभूमी ही संतांची भूमी आहे. देवता, साधू-संत आणि ऋषिमुनी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या वसुंधरेवरील प्रत्येक तीर्थक्षेत्र हे ईश्वरी ऊर्जेचा स्रोत असून मानवाला मिळालेली ती एक देणगी आहे. हिंदूंनी तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य, त्यांची मानवी जीवनातील उपयुक्तता आणि महत्त्व जाणून घेऊन तीर्थक्षेत्रांची पर्यटनाच्या नावाखाली होणारी विटंबना अन् अवमूल्यन टाळायला हवे. हे धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण अन् संवर्धन असून ते प्रत्येक हिंदूचे परम कर्तव्य आहे. हिंदु धर्मीय आणि काही धर्माचार्य धार्मिकदृष्ट्या जागृत नसल्यानेच तीर्थक्षेत्रे प्रदूषित होत आहेत. मानवाच्या भौतिक लालसेपायी गंगेसारख्या पवित्र तीर्थाचे झालेले प्रदूषण रोखून पुन्हा तिला पवित्र करणे केवळ ‘गंगा बचाव’ आंदोलनाने शक्य होणार नाही, तर प्रत्येक भारतियाच्या तिच्याप्रती आणि ईश्वराप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावानेच शक्य आहे. हिंदूंनी हाच कृतज्ञताभाव प्रत्येक तीर्थक्षेत्र आणि त्यांची महती मानवजातीपुढे आणणार्‍या थोर ऋषिमुनी किंवा उपासक यांच्याप्रती ठेवायला हवा, तरच हिंदूंना खर्‍या अर्थाने (आध्यात्मिकदृष्ट्या) या तीर्थक्षेत्रांचा लाभ होईल.’

– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (डिसेंबर २०२३)