रत्नागिरी विभागातील २५ गाड्या करण्यात आल्या रहित !

मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम !

रत्नागिरी – राज्यात चालू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर आणि बीड जिल्हा बंद आहे.  मराठा आरक्षण आंदोलन अन्य जिल्ह्यांतून तीव्र करण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विभागातून स्वारगेट, पुणे, अक्कलकोट, नांदेड, लातूर, आंबेजोगाई, उस्मानाबाद, बीड, नाशिक, तसेच शिर्डी या मार्गांवरील एकूण २५ बसेस ३१ ऑक्टोबर या दिवशी रहित करण्यात आल्या आहेत.

रहित केलेल्या बसफेर्‍यांविषयीची सूचना विभागातील प्रत्येक आगारात लावण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातील प्रत्येक आगारातून अक्कलकोट गाडी सुटते. सोलापूर आणि बीड जिल्हा ३० ऑक्टोबरपासून बंद आहे, त्यामुळे या मार्गावरील फेर्‍या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रहित करण्यात आल्या आहेत.

याविषयी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे म्हणाले की, दिवसभरात २५ फेर्‍या रहित करण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक हानी झाली आहे; मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाचे वातावरण निवळल्यानंतर बसफेर्‍या पूर्ववत् चालू करण्यात येतील.