‘युवा संघर्ष यात्रा’ स्थगित करण्याचा रोहित पवार यांचा निर्णय !

अनेक गावांमध्ये राजकीय पुढार्‍यांना ‘गावबंदी’चा परिणाम

छायाचित्र सौजन्य : सकाळ

पुणे – मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण चालू केले आहे. राज्यात ‘मराठा आरक्षण’ या विषयावरून वातावरण तापले आहे. अनेक गावांमध्ये येण्यास राजकीय पुढार्‍यांना बंदी घालण्यात आली आहे. ठिकठिकाणी एक दिवसीय किंवा साखळी पद्धतीने उपोषण करत मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चालू केलेली ‘युवा संघर्ष यात्रा’ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ही ‘यात्रा’ स्थगित केली नाही, तर मराठा समाज ‘यात्रा’ बंद पाडेल’, अशी चेतावणी मराठा आंदोलक योगेश केदार यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ‘यात्रा’ स्थगित केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली.

‘गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवत आहात काय ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयामुळे ‘यात्रा’ स्थगित केली नाही. ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, तेच युवा अस्वस्थ असतांना ही यात्रा चालू ठेवणे योग्य नाही. राज्यातील युवक आत्महत्या करत आहेत.