सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर गणेशभक्तांकडून नैसर्गिक जलस्रोेतात विसर्जनास प्राधान्य !

सोलापूर – येथे छत्रपती संभाजी तलाव या ठिकाणी २८ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. या जागृतीनंतर अनेक भाविकांनी महापालिका कर्मचार्‍यांना श्री गणेशमूर्ती न देता नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन केले. मागील वर्षी कृत्रिम हौदातील श्री गणेशमूर्ती काढतांना महापालिका कर्मचार्‍यांकडून त्या फेकून देण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे यंदा ‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी महापालिकेने तसे लिखित स्वरूपात द्यावे’, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली होती; मात्र अधिकार्‍यांनी लिखित स्वरूपात असे आश्‍वासन देण्यास नकार दिला. (यावरून गणेशभक्तांना कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास भाग पाडून मूर्तींची विटंबना करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे, असे समजायचे का ? – संपादक)

पालिका कर्मचार्‍यांच्या अशास्त्रीय कृती !

१. सोलापूर महापालिकेच्या वतीने श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे अशास्त्रीय आवाहन करण्यात आले होते, तसेच महापालिकेचे कर्मचारी पायात चप्पल घालूनच श्री गणेशमूर्ती भाविकांच्या हातातून घेऊन संकलनासाठी वाहनात ठेवत होते. (घरी १० दिवस मनोभावे पूजन केलेल्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना ती पालिका कर्मचार्‍यांच्या हातात द्यायची का ?, असा प्रश्‍न निर्माण करणारीच ही कृती आहे ! – संपादक)

२. निर्माल्य संकलनासाठी कचर्‍याच्या गाड्यांचा वापर केला जात होता.

संपादकीय भूमिका

  • प्रबोधनानंतर नैसर्गिक जलस्रोतामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणार्‍या भाविकांचे अभिनंदन !
  • शास्त्रानुसार कृती करणेच श्री गणेशाला अपेक्षित आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकच कृती अध्यात्मशास्त्रानुसार करावी !