(म्हणे) ‘जर हिंदु राष्ट्र होऊ शकतेे, तर खलिस्तान का नाही ?’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांचे देशद्रोही विधान !

रायबरेली (उत्तरप्रदेश) – जर हिंदु राष्ट्र होऊ शकतेे, तर खलिस्तान का नाही ? अन्य धर्मांच्या आधारे देशाची फाळणी होईल. यामुळेच मोठ्या लढ्याद्वारे मिळालेले स्वातंत्र्य वाचवण्यासाठी राज्यघटनेनुसार भारताला धर्मनिरपेक्षच राहू देणे योग्य आहे, असे विधान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते. बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हिंदु राष्ट्राविषयीच्या विधानावरून त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

यापूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी श्रीरामचरितमानसवर टीका केली होती. यातील काही ओळी काढण्याची मागणी त्यांनी केली होती. त्या वेळी वाद झाला होता. (मौर्य यांच्यावर त्याच वेळी कठोर कारवाई झाली असती, तर त्यांचे आता देशद्रोही विधान करण्याचे धाडस झाले नसते. आताही त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे. तरीही अशा प्रकारची तुलना करून मौर्य यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दाखवण्यासह देशद्रोही मानसिकताही दाखवली आहे. अशांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !