भारत आणि पाकिस्तान यांनी यावर्षी एकमेकांना दिल्या नाहीत स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत आणि पाकिस्तान यांनी यावर्षी एकमेकांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नाहीत. गेल्या ७५ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. १४ ऑगस्टला पाकचा, तर १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. पाकिस्तानमधील दैनिक ‘द न्यूज’ने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी वाईट झाले आहेत. दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांनी एकमेकांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देण्याची परंपरा समाप्त केली आहे. यातून लक्षात येते की, या दोन्ही देशांचे संबंध किती बिघडलेले आहेत.

पाकची वृत्तवाहिनी ‘जियो न्यूज’ने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्यामागे भारतीय नेतृत्वाची आक्रमकता कारणीभूत आहे. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! गेल्या ७५ वर्षांत जे भारताने करायला हवे होते, ते आता करण्यास प्रारंभ केल्याने पाकला मिरच्या झोंबू लागल्या आहेत ! – संपादक) भारतात जेव्हापासून भाजपची सत्ता आली आणि पंतप्रधान मोदी यांनी पदभार सांभाळला आहे, तेव्हापासून संबंध आणखी बिघडले. (पाकला भारतासमवेत चांगले संबंध हवेत आहेत, तर त्याने तसे वागणेही आवश्यक आहे. पाक भारताशी कसा वागतो, हे जगाला ठाऊक आहे ! – संपादक) नोव्हेंबर २०१६ मध्ये भारताने पाकमध्ये झालेल्या सार्क शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.

संपादकीय भूमिका

पाकने भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि भारताने ते सहन करत पाकला त्याच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा द्यायच्या, हा काळ आता संपला आहे, हेच भारत दाखवून देत आहे ! जर पाकला भारताशी चांगले संबंध ठेवायचे असतील, तर त्याने तसे वागणेही आवश्यक आहे !