मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध !

रत्नागिरी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत झाडे लावण्याची मोहीम महामार्ग विभागाने हाती घेतली आहे. या वेळी महामार्ग विभागाकडून विदेशी झाडे लावली जात आहेत. याला येथील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. चिपळूण तालुक्यातील पेढे येथे महामार्ग विभागाने लावलेली विदेशी गुलमोहराची झाडे सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी काढायला लावली आणि त्या जागी देशी जातीचे झाडे लावण्याची सूचना महामार्ग विभागाला केली.

याविषयी शाहनवाज शाह म्हणाले की,

१. सध्या राज्यात तापमान वाढत आहे. त्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. या तापमानवाढीची अनेक कारणे समोर आली आहेत. विदेशी वृक्षांची संख्या वाढल्यानेही स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत आहे. त्यामुळे महामार्गाच्या शेजारी स्थानिक जातीचे वृक्ष लावावेत.

२. उन्हाळ्यात विदेशी झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ होत असते. त्यामुळे एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये सूर्याचे किरण थेट भूमीवर पडतात. यामुळे भूमीची उष्णता वाढते आणि तापमानात पालट होतो.

३. विदेशी झाडांपैकी ५५ टक्के झाडांच्या प्रजाती मूळ अमेरिकेतील आहेत. ‘बॉटनिक गार्डन’च्या विकासासाठी इंग्रजांच्या काळात आपल्याकडे विदेशी झाडे आणली गेली आणि पुढील काळातही तसेच चालू राहिले.

४. विदेशी झाडे निरुपयोगी ठरतात. त्यांच्या वाढीसाठी अधिक पाणी लागते.

५. विदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत. घरटेही बनवत नाहीत.

६. परिसरातील सौंदर्य वाढवण्यासाठी या झाडांचा अधिक वापर होतो; मात्र पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला स्थानिक जातीची झाडे हवीत.

संपादकीय भूमिका

  • विदेशी झाडे लावून केवळ सौंदर्यवाढीसाठी नव्हे, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे, हे महमार्ग विभागाला केव्हा  समजणार ?
  • विदेशी झाडांनी होणारी हानी लक्षात घेता देशी झाडांमुळे होणारा लाभ महामार्ग विभागाला समजेल, तो सुदिन