दोन निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची निर्दोेष मुक्तता झाल्याप्रकरणी आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अधिवक्त्यांच्या हस्ते सत्कार !  

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरण

छायाचित्रात (डावीकडून) अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता प्रदीप माकणे, अधिवक्ता डी.एम्. लटके, सत्कार करतांना अधिवक्ता अनिल रुईकर, सत्कार स्वीकारतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता प्रवीण करोशी, अधिवक्ता परशराम एन्. तारीहाळ, अधिवक्ता सारंग जोशी, अधिवक्त्या स्नेहा इंगळे आणि अधिवक्त्या प्रीती पाटील

कोल्हापूर, २२ जून (वार्ता.) – गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बेस्ट बेकरी प्रकरणाच्या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने १३ जून या दिवशी निकाल देतांना हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या २ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती. हे दोघे गेल्या १० वर्षांपासून कारागृहात होते. या खटल्याचे कामकाज हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उत्कृष्टरित्या पाहिले. अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी या २ आरोपींच्या बाजूने उत्कृष्ट युक्तीवाद करून न्यायालयात हर्षद आणि मफत या आरोपींचा बेस्ट बेकरी प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही, हे दाखवून दिले.

त्यानुसार सत्र न्यायालयाने या २ आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. याविषयी इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील अधिवक्ता अनिल रुईकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्त्या प्रीती पाटील, अधिवक्त्या स्नेहा इंगळे, अधिवक्ता प्रदीप माकणे, अधिवक्ता सारंग जोशी, अधिवक्ता प्रवीण करोशी आणि अधिवक्ता डी.एम्. लटके उपस्थित होते.