रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक !

  • राजापूर तालुक्यातील पाचल येथील व्हॉट्सअ‍ॅप गटात प्रसारित केली छत्रपतींविषयी आक्षेपार्ह पोस्ट !

  • शिवप्रेमी आणि भाजप यांच्याकडून निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांना आली जाग !

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील पाचल येथील धर्मांध कमाल प्रभूलकर (वय ५२ वर्षे) याने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवर ७ जून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. त्यानंतर शिवप्रेमी संजय नलावडे यांनी राजापूर पोलीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन पाठवून ‘आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली. अशाच प्रकारचे निवेदन राजापूर तालुका भाजपच्या वतीने ८ जून या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे आणि पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना देण्यात आले. या वेळी भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर या प्रकाराची नोंद घेऊन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सरकारच्या वतीने फिर्यादी होऊन या आरोपी कमालच्या विरोधात भा.दं.वि.क. १५३ (१) (अ) (ब), ५०५ (२) प्रमाणे ७ जून २०२३ या दिवशी गुन्हा नोंद केला. यानंतर राजापूर पोलिसांनी कमाल याला अटक केली असून या गुन्ह्याचे अधिक अन्वेषण राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे हे करत आहेत.

श्री. नलावडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. पाचल पंचक्रोशीत सुमारे ८०० ते ९०० सदस्य असलेल्या मोठ्या व्हॉट्सअ‍ॅप गटावर ७ जूनच्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एकेरी भाषेत, तसेच त्यांचा अवमान करणारी संवेदनशील पोस्ट ‘फॉरवर्ड’ करण्यात आली होती.

२. अशा प्रवृती वाढीस लागता कामा नयेत. यासाठी केवळ क्षमा मागून नाही, तर अशा समाजातील वातावरण कलुषित करणार्‍या प्रवृतीवर रितसर कायदेशीर कारवाई करून संबधित ‘ग्रुप अ‍ॅडमिन’लाही तशी समज देणे आवश्यक आहे.

रत्नागिरी पोलिसांकडून आवाहन !

या प्रकारानंतर रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही जाती अथवा धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो, लिखाण सामाजिक माध्यमांवर (फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, द्वीटर) पोस्ट करू नयेत, फॉरवर्ड करू नयेत. अशा प्रकारचे कृत्य कुणी जाणीवपूर्वक केल्यास ८८३०४०४६५०, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष (०२३५२) २२२२२२ या क्रमांकावर संपर्क करावा. कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये.

संपादकीय भूमिका 

  • अशा गोष्टींसाठी पोलिसांना निवेदन द्यावे का लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? ‘निवेदन दिले नसते, तर पोलीस गप्पच बसले असते’, असेच हिंदूंना वाटते !
  • हिंदूंनी अन्य धर्मियांविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याची अफवा जरी पसरली, तरी पोलीस स्वतःहून कारवाई करतात. हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस मुसलमानांसमोर नांगी टाकतात, हे लक्षात घ्या !