जगाची भारताला ऐकायची इच्छा ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

राहुल गांधी त्यांच्या कथा देशात चालल्या नाहीत म्हणून परदेशात जातात, अशी टीका !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – आज लोकांना भारताचे ऐकायचे आहे आणि त्यांना वाटते की, भारतासमवेत काम केल्यास त्यांचा प्रभाव वाढेल. जग विशेषतः दक्षिण गोलार्धातील देश भारताला त्यांचा ‘विकास भागीदार’ म्हणून पहातात, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या परराष्ट्र धोरणातील कामगिरीची माहिती देतांना केले. ‘नाटो प्लस’ देशांमध्ये भारताचा समावेश करण्याच्या अमेरिकी खासदारांच्या मागणीवर डॉ. जयशंकर म्हणाले की, आम्हाला कोणत्याही साच्यात रहायचे नाही. हे भारताचे धोरण आहे.

या वेळी एका पत्रकाराने राहुल गांधी यांच्या परदेश दौर्‍यांविषयी जयशंकर यांना प्रश्‍न विचारला. त्यावर जयशंकर म्हणाले की, जेव्हा त्यांच्या विणलेल्या कथा देशात चालत नाहीत, तेव्हा ते समर्थनासाठी परदेशात जातात. त्यांना (राहुल गांधी यांना) सवय आहे की, ते बाहेर गेल्यावर देशावर टीका करतात. आमच्या राजकारणावर भाष्य करतात.

देशांत निवडणुका होतात; निवडणुकीत कधी एक पक्ष जिंकतो, तर कधी दुसरा पक्ष. देशात लोकशाही नसेल, तर असा पालट होत नाही. आम्हाला ठाऊक आहे की, वर्ष २०२४ च्या निवडणुकीचा निकाल असाच लागेल.