जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

सनातन धर्माविषयी वर्ष १९३० मधील एका लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही. सनातन धर्म बुडवणे मूठभर सुधारकांच्याच नव्हे, तर मनुष्यजातीच्याही हातचे नाही. जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो. आदिशक्तीचे स्वरूप, जगताचे आदिकारण आणि आदिनियम हे सनातन, शाश्वत आणि त्रिकालाबाधित आहेत. भगवद्गीतेत किंवा उपनिषदांत याविषयीचे जे सिद्धांत प्रकट केले आहेत, ते सनातन आहेत. ते पालटणे ही मनुष्यशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. ते सिद्धांत आहेत ते आहेत आणि तसेच कायम रहाणार.’’