कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा मार्गांनी साधना करणार्‍या कणगलेकर कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कणगलेकर कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी कणगलेकर कुटुंबियांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

(भाग १)

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. यशवंत कणगलेकर

श्री. यशवंत कणगलेकर

१ अ. जाणवलेले सूत्र : ‘प.पू. गुरुदेव ‘सनातनच्या कार्याची सूत्रे पुढे दैवी बालकांच्या हाती देण्याची प्रक्रिया घडवत आहेत’, असे जाणवले. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे) बोलत असतांना ‘ती लवकरच समष्टी कार्यात सहभागी होईल’, असे वाटून मला आनंद होत होता.

१ आ. मन निर्विचार होणे : भावसत्संग चालू होण्यापूर्वी माझ्या मनात अनेक विचार येत होते; पण भावसत्संग चालू झाल्यावर हळूहळू माझे मन निर्विचार होऊ लागले आणि इतरांचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत होत होता.

१ इ. मुलांना घडवण्याचे श्रेय पत्नीला देणे : सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘तुम्ही ‘मुलांना (होमिओपॅथी वैद्य अंजेश आणि श्री. सत्यकाम यांना) कसे घडवले ?’ ते सांगा.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी जीवनातील फार अल्प काळ मुलांच्या समवेत राहिलो. मग मी त्यांना कसे घडवणार ? मुलांना घडवण्याचे काम त्यांच्या आईने केले आहे; मात्र घरविक्रीच्या प्रक्रियेच्या ४ – ५ मासांच्या कालावधीत मी मुलांना पुष्कळ जवळून अनुभवले. त्या वेळी त्यांचे पुष्कळ गुण माझ्या लक्षात आले. ते मी लिहून देणार आहे.’’

२. सौ. अंजली यशवंत कणगलेकर

सौ. अंजली कणगलेकर

बेळगाव येथील घराच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ४ – ५ मास घरी असतांना झालेली विचारप्रक्रिया, शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

२ अ. विचारप्रक्रिया

१. गेल्या २० वर्षांत कुटुंबातील आम्हा चौघांना अगदी मोजक्या वेळीच एकत्र रहाता आले. या ४ मासांत ‘देवाने आम्हाला एकत्र रहाण्याची संधी दिली आहे’, असे मला वाटले.

२. आम्ही घरातील सर्व साहित्य बांधून ठेवल्याने घरात अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला, तरी त्यातच दिवस काढले. हे करतांना ‘हा आपल्यासाठी आपत्काळच आहे’, असा विचार राहिल्याने आनंदात राहून ‘देव आपत्काळाची सिद्धता करवून घेत आहे’, असे मला जाणवले.

२ आ. शिकायला मिळालेली सूत्रे

२ आ १. देवाने वर्तमानकाळात रहाण्यास शिकवणे

अ. घराच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण करत असतांना प्रत्येक दिवशी निरनिराळे प्रसंग समोर येत होते. त्यांतून मार्ग काढतांना देवाने वर्तमानकाळात रहायला शिकवले.

आ. ‘घरातील साहित्याचे काय करायचे ?’ या संदर्भात दायित्व असलेल्या कर्नाटकातील साधकांना संपर्क केला. ‘त्यांच्याकडून काय सूत्रे येतात ?’, ती समजून घेऊन त्यानुसार कृती करणे, त्याप्रमाणे ‘गोव्याला रामनाथी आश्रमात विचारून ‘त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचे पालन करणे’, असे केले. हे सर्व करतांना देवाने आम्हाला वर्तमानकाळात रहायला शिकवले.

२ आ २. परिस्थिती स्वीकारणे : देवाने सतत होणारे पालट स्वीकारून पुढची कृती करतांना परिस्थिती स्वीकारण्यास शिकवले.

२ इ. जाणवलेली सूत्रे

२ इ १. स्वतःच्या संदर्भात

अ. घरविक्री प्रक्रियेच्या संदर्भात आणि अन्य प्रसंगातही आम्हा सर्वांच्या मनात सारखाच विचार यायचा.

आ. काही वेळा एखाद्या सूत्रावरून मनात संघर्ष झालाच, तर देव मुलांच्या माध्यमातून काळजी घ्यायचा. मुलांशी बोलल्यामुळे सगळे अनावश्यक विचार निघून जाऊन पुन्हा भावस्थितीत रहाता येणे शक्य व्हायचे.

इ. देवाने ४ – ५ मासांत काहीही न्यून पडू दिले नाही. ‘ज्या गोष्टीची आवश्यकता असायची, ती गोष्ट देव कुणाच्या तरी माध्यमातून पुरवत होता’, हे लक्षात येऊन कृतज्ञता व्यक्त व्हायची.

२ इ २. श्री. यशवंत कणगलेकर (यजमान)

१. श्री. कणगलेकर यांचे स्वास्थ्य ठीक नसते, तरीही ते ‘इतरांची काळजी घेणे, इतरांची अडचण समजून घेऊन त्यांना जमेल, ते साहाय्य करणे’, असे करतात.

२. या कालावधीत ‘कुटुंबियांचे स्वास्थ्य चांगले राहून काही अडचणी येऊ नयेत’, यासाठीही त्यांनी सर्वांकडून आवश्यक ते आध्यात्मिक स्तरावरील उपाय करवून घेतले.

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वत:च्या सेवेतून काय अपेक्षित आहे ?’, याचे चिंतन करून त्यानुसार सेवा करण्याचा त्यांना सतत ध्यास असतो.

२ इ ३. होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर (मोठा मुलगा)

वैद्य अंजेश कणगलेकर

१. अंजेश सगळ्यांची काळजी घेतो.

२. त्याला काही सांगण्याआधीच ‘प्रत्येकाला काय हवे आहे ?’, हे समजून त्याची कृती होते.

३. कुणी काही सांगितले, तरी तो त्यावर चिंतन करून आणि त्याची माहिती घेऊन विचारपूर्वक कृती करतो. घराच्या विक्रीप्रक्रियेच्या संदर्भात त्याने केलेली प्रत्येक कृती अशाच प्रकारे होत होती.

४. त्याची परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा आहे.

५. ‘तो अध्यात्म जगतोय’, असे मला वाटते. अंजेश घटना आणि प्रसंग यांकडे आध्यात्मिक स्तरावरून पहातो. त्यामुळे ‘त्याचा प्रत्येक विचार आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्तरावरचा असतो’, असे माझ्या लक्षात आले आहे. त्याच्या मनात अनावश्यक विचार नगण्य असतात.

६. घराच्या विक्रीसंदर्भात तो म्हणाला, ‘‘ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठीच आहे. तुम्हा सर्वांपेक्षा मलाच घराविषयी अधिक ममत्व वाटत होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या मनातून ते पूर्ण काढून माझे मन सिद्ध केले आहे.’’

७. विक्रीच्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होत आल्यावर तो म्हणाला, ‘‘या प्रक्रियेच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी आपणा सर्वांना पुढच्या टप्प्याच्या आश्रमात, म्हणजे वर्णाश्रमात नेले आहे.’’ हे सांगतांना त्याच्या चेहर्‍यावर पुष्कळ आनंद आणि भाव जाणवत होता.’

२ इ ४. श्री. सत्यकाम कणगलेकर

श्री. सत्यकाम कणगलेकर

१. त्याला कुटुंबाच्या दायित्वाची जाणीव असल्याने तो त्याच्या दादाला (होमिओपॅथी वैद्य अंजेश याला) साहाय्य करण्यास सदैव तत्पर असतो.

२. तो पुष्कळ सकारात्मक झाला असून अडचणी आल्यावर कोणतेही सूत्र सोडून न देता, तो त्यावर उपायात्मक कृती करून सूत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. सत्यकाम प्रत्येक गोष्टीचा विचार आध्यात्मिक स्तरावरून करतो.

३. त्याच्यातील साधनेचे गांभीर्यही वाढले आहे. ‘कुटुंबातील सर्वांची साधना होत आहे ना ?’ याकडे त्याचे सतत लक्ष असते. कुणी न्यून पडत असल्यास त्या त्या वेळी तो त्यांना सहजतेने त्याची जाणीव करून देतो. त्याची ‘केवळ कुटुंबातीलच नव्हे, तर त्याच्या समवेत सेवा करणार्‍या सर्वच साधकांची साधना व्हावी आणि त्यांनी सेवेतील सूत्रे शिकून पुढे जावे’, अशी तळमळ वाढली आहे. तो बेळगावला असला, तरी त्याच्या सेवांच्या संदर्भातील सत्संगांमध्ये तो सतत व्यस्त असायचा. त्या वेळी त्याचा सर्वांप्रतीचा प्रेमभाव लक्षात आला.

४. प्रत्येक कृती दायित्व घेऊन करण्याचा त्याचा प्रयत्न मला प्रकर्षाने जाणवला. मला स्वयंपाकघरात साहाय्य करणे असो, स्वच्छता करणे असो किंवा घरी आलेल्यांची विचारपूस करणे असो, प्रत्येक कृती स्वतःहून आणि परिपूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न माझ्या मनाला भावला.

५. त्याच्या बोलण्यातून क्षणोक्षणी श्री गुरूंप्रतीचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा) भाव जाणवतो.

६. घर विकायचे ठरवल्यावर घर बघण्यासाठी लोक येत होते. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना, त्यांना घर दाखवतांना तो भावाच्या स्तरावर कृती करत असल्याचे जाणवत होते. जे लोक अध्यात्माशी जोडले आहेत किंवा ज्यांना देवा-धर्माविषयी श्रद्धा आहे, अशांना घराविषयी सांगतांना तो आध्यात्मिक स्तरावरील सूत्रांच्या साहाय्याने वास्तूचे महत्त्वही सांगत होता. त्यामुळे कित्येकांची भावजागृती झाली आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले गेले. त्याच्या या भावामुळेच एक कुटुंब शेवटपर्यंत ही वास्तू घेण्याकरता प्रयत्न करत होते.’

(क्रमशः)

भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/639013.html

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक